जामनेर भूमिअभिलेख कार्यालयात एसीबीचा सापळा; २०१२ मध्येही लाचखोरीचा गुन्हा

जळगाव प्रतिनिधी : लाचखोरीच्या प्रकरणात यापूर्वी कारवाई झालेल्या भूमिअभिलेख विभागातील भूकरमापकाला पुन्हा लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले.

शेतीच्या मोजणीसाठी आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती देण्यासाठी ७०० रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र, तडजोडीनंतर २०० रुपये घेण्याचे निश्चित झाले आणि ते स्वीकारताच एसीबीने कारवाई केली.
भगवान रोहिदास गायकवाड (५१, भुसावळ) असे कारवाई झालेल्या भूकरमापकाचे नाव आहे. जामनेर येथील भूमिअभिलेख विभागाच्या उपअधीक्षक कार्यालयात मंगळवारी ही कारवाई झाली.

नेरी बुद्रूक येथील ६५ वर्षीय शेतकऱ्याने शेतीची मोजणी करण्यासाठी आवश्यक असलेले स्कीम पत्रक आणि टिपण उतारा मिळविण्यासाठी २ सप्टेंबरला अर्ज केला होता. या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती देण्यासाठी गायकवाड यांनी ७०० रुपयांची लाच मागितल्याची तक्रार शेतकऱ्याने एसीबीकडे केली.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. तडजोडीनंतर २०० रुपये स्वीकारण्यास गायकवाड यांनी सहमती दर्शविली. ठरलेल्या ठिकाणी तक्रारदाराकडून पैसे स्वीकारताच एसीबी पथकाने त्यांना पकडले.
१४ वर्षांनी पुन्हा एसीबीच्या जाळ्यात
गायकवाड यांच्याविरुद्ध २०१२ मध्ये भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात लाच स्वीकारल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.
आता १४ वर्षांनी पुन्हा लाचखोरीच्या प्रकरणात ते एसीबीच्या कारवाईला सामोरे गेले आहेत.
पोलिस निरीक्षक हेमंत नागरे यांनी सापळा अधिकारी म्हणून, तर पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांनी पर्यवेक्षक अधिकारी म्हणून काम पाहिले. हवालदार बाळू मराठे, प्रणेश ठाकूर, सचिन चाटे यांच्यासह पथकातील अन्य कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला.








