जळगाव, (प्रतिनिधी) : स्थानिक सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अग्रगण्य संस्था ‘परिवर्तन’च्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून, ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ निमित्त सुप्रसिद्ध कवी व गीतकार मंगेश पाडगावकर यांच्या कविता आणि गाण्यांवर आधारित “तुझे गीत गाण्यासाठी…” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम बुधवार, १५ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता महाबळ रोडवरील भाऊंच्या उद्यानापुढे, हतनूर सभागृहाजवळ असलेल्या ‘अभियंता भवन’ येथे संपन्न होणार आहे.

महाकवी कालिदास यांच्या ‘मेघदूत’ काव्य लेखनाचा प्रारंभीचा दिवस देशभर ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ म्हणजेच ‘कवितेचा दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून जळगाव शहरातील ‘परिवर्तन’ संस्था गेल्या २५ वर्षांपासून मराठी भाषेतील विविध नामवंत कवींच्या साहित्याचा जागर करत आली आहे. यापूर्वी संस्थेने अरुण कोलटकर, ना. धों. महानोर, बहिणाबाई, भालचंद्र नेमाडे, गुलजार आणि खानदेशी कवितांवर आधारित दर्जेदार कार्यक्रम सादर केले आहेत. यंदा पाडगावकरांच्या अजरामर रचनांनी ही सांध्यकाळ न्हाऊन निघणार आहे.

डॉ. किशोर पवार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमाचे दिग्दर्शन डॉ. मनोज पाटील यांनी केले आहे. निर्मिती प्रमुख म्हणून श्वेता गरुड व समृद्धी पाटील जबाबदारी सांभाळत आहेत. कार्यक्रमात अंजली धुमाळ, अक्षय नेहे, लीना लेले, आणि मानसी गगडाणी हे कलावंत पाडगावकरांचे काव्य सादर करणार असून, हर्षल पाटील कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत.
हा कार्यक्रम सर्व रसिक प्रेक्षकांसाठी विनामूल्य व खुला असून, जळगावकर रसिकांनी या काव्यमय सादरीकरणाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन परिवर्तनचे कार्याध्यक्ष नारायण बाविस्कर आणि उपाध्यक्ष मंजुषा भिडे यांनी केले आहे.








