जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील विजेच्या विस्कळीत पुरवठ्यासह विविध गंभीर समस्यांवर तोडगा काढण्यासाठी उपमहापौर मनोज चौधरी आणि स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिका व महावितरण (MSEB) अधिकाऱ्यांची एक महत्त्वाची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत लोकप्रतिनिधींनी शहरातील वीज व्यवस्थेच्या बोजवारा उडालेल्या स्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त करत, सर्व त्रुटींवर लवकरात लवकर दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्याचे कडक आदेश प्रशासनाला दिले आहेत.
या महत्त्वाच्या बैठकीला लोकप्रतिनिधींसह महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुरेंद्र उन्हाळे, सहाय्यक अभियंता निलेश कुरसंगे आणि महापालिका विद्युत विभागाचे प्रमुख मोरे साहेब व कनिष्ठ अभियंता सुमित पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
बैठकीत लोकप्रतिनिधींनी जळगाव शहरातील नागरिकांना सहन कराव्या लागणाऱ्या विविध समस्यांचा पाढाच अधिकाऱ्यांसमोर वाचला. शहरात रात्रीच्या वेळी वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तसेच रस्त्यावरील दिवे (स्ट्रीट लाईट) रात्रीच्या वेळी बंद आणि दिवसा मात्र चालू राहण्याचा अजब कारभार सुरू असल्याकडे लक्ष वेधण्यात आले. शहरात अनेक ठिकाणी विजेच्या केबल्स अतिशय धोकादायक पद्धतीने लोमकळत असून, अनेक भागांतील ट्रान्सफॉर्मरच्या पेट्या उघड्या असल्याने मोठ्या अपघाताची भीती व्यक्त करण्यात आली. याशिवाय, सर्व्हिस रोडसह अनेक रस्त्यांच्या मधोमध असलेले महावितरणचे पोल वाहतुकीला मोठा अडथळा ठरत असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
निमखेडी सबस्टेशन परिसरातील विजेच्या गंभीर समस्येवरही यावेळी चर्चा झाली. या सबस्टेशनमध्ये काम करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ (स्टाफ) उपलब्ध नसल्याने कामाचा बोजवारा उडत असल्याचे समोर आले. त्यातच भर म्हणून, लाईट गेल्यावर नागरिक जेव्हा तक्रार केंद्रांवर किंवा सबस्टेशनला फोन करतात, तेव्हा अनेकदा फोन लागत नाही किंवा कर्मचारी फोन उचलत नसल्याने तक्रार निवारण केंद्रांच्या उदासिनतेबद्दल लोकप्रतिनिधींनी तीव्र संताप व्यक्त केला.
या सर्व गंभीर समस्यांची दखल घेत उपमहापौर मनोज चौधरी आणि स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी महावितरण व महापालिकेच्या विद्युत विभागाला तातडीने समन्वय साधून कामाला लागण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांची गैरसोय खपवून घेतली जाणार नाही, असे बजावत सर्व धोकादायक केबल्स, उघडे ट्रान्सफॉर्मर आणि रस्त्यावरील पोल हटवण्यासह तक्रार निवारण यंत्रणा तात्काळ सुधारण्याचे कडक आदेश यावेळी देण्यात आले. या संयुक्त बैठकीमुळे आता शहरातील रखडलेल्या विद्युत कामांना गती मिळण्याची चिन्हे आहेत.








