जळगाव, (प्रतिनिधी) : जिल्ह्याची प्रमुख कृषी ओळख असलेल्या आणि ‘जी.आय.’ मानांकन प्राप्त ‘जळगाव केळी’ला जागतिक बाजारपेठेत सक्षमपणे पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारच्या विशेष पथकाने नुकताच जळगाव जिल्ह्याचा दौरा केला. या पथकाने जिल्ह्यातील निर्यात पायाभूत सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर, जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण उच्चस्तरीय आढावा बैठक पार पडली.
या बैठकीत एनसीसीडी चे सीओओ आशिष फोतेदार, एमआयडीएच चे राहुल कुमार, एनसीसीडीचे सल्लागार प्रितम सरकार, आयसीएआर चे प्रधान शास्त्रज्ञ डॉ. पी. सुरेश कुमार व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जी. प्रभू, अपेडा मुंबईचे श्री. वाघमारे, हॅल्कॉन नाशिकचे सीईओ तथा नोडल ऑफिसर सतीश गरजे, राष्ट्रीय फलोत्पादन बोर्ड नाशिकचे प्रादेशिक अधिकारी आणि जळगावचे कृषी उपसंचालक भरत इंगळे आदी वरिष्ठ अधिकारी व तज्ज्ञ प्रामुख्याने उपस्थित होते.
बैठकीदरम्यान जळगावच्या केळी निर्यातीला गती देण्यासाठी प्री-कूलिंग युनिट्स, पॅक हाउसेस आणि रीफर कंटेनर्स या पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणावर सखोल चर्चा करण्यात आली. याशिवाय, निर्यात प्रक्रियेतील वाहतूक व लॉजिस्टिक्सच्या अडचणींचे निवारण करणे, आंतरराष्ट्रीय मानकांनुसार कीडमुक्त व दर्जेदार केळी उत्पादनासाठी शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करणे आणि काढणीपश्चात गुणवत्ता टिकवण्यासाठी शीतसाखळी व्यवस्थापनाचा दर्जा उंचावणे या मुद्द्यांवर भर देण्यात आला.
केंद्र सरकारच्या MIDH, APEDA आणि NCCD या संस्थांच्या विविध योजनांचा जिल्ह्यात प्रभावी समन्वय साधून आगामी काळासाठी एक ठोस व कालबद्ध कृती आराखडा निश्चित करण्याचा सकारात्मक निर्णय या बैठकीत घेण्यात आला. जळगावच्या केळीमध्ये जागतिक बाजारपेठ काबीज करण्याची मोठी क्षमता असून, जिल्ह्यातील निर्यातदार आणि शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करून दर्जेदार पायाभूत सुविधा निर्मितीला जिल्हा प्रशासन प्राधान्य देईल, असा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.








