जळगाव, (प्रतिनिधी) : राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील जिल्हे उष्णतेच्या बाबतीत संवेदनशील असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला असून, जळगाव जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी विविध विभागांना खबरदारी घेण्याचे व कडक उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले आहेत. ४५ अंशांवर तापमान असताना सलग काही दिवस उष्णतेची लाट राहिल्यास हा गंभीर इशारा दिला जातो, ज्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

वाढत्या तापमानामुळे मजुरांना भरदिवसा कडाक्याच्या उन्हात कामावर ठेवू नये, अशी सक्त ताकीद देण्यात आली असून, कामगारांना बळजबरीने वेठीस धरणाऱ्या आस्थापनांविरोधात तातडीने कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तसेच शाळा, महाविद्यालये आणि मनरेगाच्या कामांच्या वेळेत तातडीने बदल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी शहरातील उद्याने दिवसभर खुली ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असून, शैक्षणिक संस्थांमध्ये पुरेसा जलसाठा व इतर उपाययोजना तातडीने उभारण्याचे आदेशही प्रशासनातर्फे देण्यात आले आहेत.











