जळगाव, (प्रतिनिधी) : मार्च महिन्यातच जळगावचे तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पार गेल्याने उन्हाच्या तीव्र झळा लागण्यास सुरुवात झाली आहे. या भीषण उष्णतेचा सर्वाधिक फटका रस्त्यावरील मोकाट जनावरे आणि पशू-पक्ष्यांना बसत असून, पाण्यासाठी त्यांची भटकंती होत आहे. ही बाब लक्षात घेऊन शहरातील व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते रमेशकुमार मुनोत यांनी भूतदयेच्या भावनेतून जलकुंड आणि परळ मोफत वाटप करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.
पाण्याची सोय आणि सावलीचीही काळजी..
या विशेष मोहिमेअंतर्गत शहरात एकूण १५० जलकुंड आणि ५० परळ मोफत वितरित केले जाणार आहेत. केवळ पाणी उपलब्ध करून देऊन न थांबता, रमेशकुमार मुनोत यांनी नागरिकांना एक महत्त्वाचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, “नागरिकांनी हे जलकुंड किंवा परळ उन्हात न ठेवता सावलीच्या ठिकाणी ठेवावेत, जेणेकरून पाणी थंड राहील आणि पशू-पक्ष्यांना तिथे विसावा मिळेल.” विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी नैसर्गिक सावली उपलब्ध नाही, तिथे सावलीसाठी मुनोत यांच्याकडून बॅनरची सुविधाही दिली जाणार आहे.
नोंदणी आणि वितरणाची माहिती..
हा उपक्रम शिस्तबद्ध पद्धतीने राबवण्यासाठी नागरिकांना आगाऊ नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नोंदणीसाठी इच्छुक नागरिकांनी ९३२५९२२३०५ या क्रमांकावर संपर्क साधून आपली नोंदणी करावी. ’जलकुंड’ आणि ‘परळ’ वाटप सोमवार, दि. २३ मार्चपासून वाटप सुरू होईल. वाढत्या उन्हात मुक्या जीवांची तहान भागवण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन सहकार्य करावे, अशी विनंती रमेशकुमार मुनोत यांनी केली आहे.








