जळगाव, (प्रतिनिधी) : “महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आपली कामे कोणत्याही दबावाला बळी न पडता नियमानुसार व प्रामाणिकपणे करावीत. नियमबाह्य कामांसाठी कोणी दबाव आणत असल्यास ती बाब तत्काळ पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्यावी. चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आम्ही सदैव खंबीरपणे उभे आहोत,” असे आश्वासन उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी दिले. जळगाव महानगरपालिकेत आयोजित ‘कर्मचारी संवाद’ कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
या प्रसंगी व्यासपीठावर उपायुक्त निर्मला गायकवाड, धनश्री शिंदे, मुख्य लेखाधिकारी विजयकुमार सोनवणे, सहाय्यक आयुक्त उदय पाटील यांसह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. या संवाद कार्यक्रमात कैलास चौधरी, गौरव सपकाळे, समीर बोरोले, सुजाता पाटील यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित समस्या मांडल्या. यामध्ये प्रामुख्याने स्थायित्व प्रमाणपत्र, अतिरिक्त कार्यभाराचा मोबदला, पदोन्नती, पगाराची अनिश्चित तारीख, सेवानिवृत्तांची एटीएम सेवा आणि २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करणे या मागण्यांचा समावेश होता.
प्रशासनाच्या वतीने उत्तरात सांगण्यात आले की, सध्या मनपात केवळ १३०० कर्मचारी कार्यरत असल्याने कामाचा अतिरिक्त ताण आहे. तरीही, पहिल्या टप्प्यात ४५० जणांना कालबद्ध पदोन्नती देण्यात आली असून, नवीन भरतीसाठीची बिंदुनामावली विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात आली आहे. तसेच सेवानिवृत्तांच्या थकीत रकमेसाठी तरतूद केली जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
शेवटी, ज्या कर्मचाऱ्यांना आज संवाद साधता आला नाही, त्यांनी आपल्या समस्या ४-५ दिवसांत उपमहापौर कार्यालयाकडे लेखी स्वरूपात द्याव्यात, त्यावर सकारात्मक तोडगा काढला जाईल, अशी ग्वाही मनोज चौधरी यांनी दिली.







