जळगाव, (प्रतिनिधी) : शेतीत निर्माण होणारे पिकांचे अवशेष हा कचरा नाही तर ते एक उत्पन्नाचे मोठे साधन होऊ शकते. पर्यावरण संवर्धनासोबतच देशासाठी महत्त्वाचे असणारे कार्बन क्रेडीट त्यातून कमाविता येऊ शकतात. शेतातील जैविक कोळसा म्हणजे बायोचार होय. शाश्वत शेतीसह शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळावे, यासाठी कंपनीकडून उभारण्यात येणारा ‘जैन औद्योगिक बायोचार प्रकल्प’ देशात अग्रसेर ठरेल, असा सूर जैन हिल्स येथे झालेल्या बायोचार प्रकल्पाच्या सल्लामसलत संवादसत्रातून शुक्रवारी (ता.२१) निघाला.
जैन हिल्स येथील बडी हंडा सभागृहात झालेल्या या कार्यशाळेप्रसंगी व्यासपीठावर जळगाव जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी, केळी संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. अरुण भोसले, मुक्ताईनगर कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत बाहेती, कापूस संशोधक गिरीष चौधरी, संशोधक गणेश देशमुख, शेतकरी प्रतिनिधी किशोर चौधरी, सुधाकर येवले, लता बारी उपस्थित होते.
यावेळी पंचक्रोशितील शेतकरी, अभ्यासक आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी जैन फार्म फ्रेश फूडचे संचालक अथांग जैन यांनी ऑनलाईन संवाद साधला. प्रकल्पामागील भूमिका त्यांनी मांडली. जैन इरिगेशनचा परिचय, उद्दिष्टे, ध्येयदृष्टिकोन, शाश्वत शेतीबाबत बांधिलकी तसेच बायोचार प्रकल्पाविषयी माहिती त्यांनी दिली. ‘सार्थक करुया जन्माचे रुप पालटू वसुंधरेचे’ या श्रद्धेय भवरलालजी जैन तथा मोठ्याभाऊंच्या विचारांतूनच हा प्रकल्प अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरू शकेल, अशी अपेक्षा अथांग जैन यांनी व्यक्त केली.
या प्रकल्पात आंब्याच्या कोया, मक्याचे भुट्टे, कापसाच्या काड्या यासारख्या शेती व अन्न प्रक्रिया उद्योगातील अवशेषांचा वापर करून बायोचार तयार केला जातो. यामुळे उघड्यावर कचरा जाळण्यामुळे तयार होणारे हरितगृह वायू उत्सर्जन कमी होईल. पर्यावरणपूरक शेतीला चालना मिळेल. महाराष्ट्रात दरवर्षी तयार होणाऱ्या २१ दशलक्ष मेट्रिक टन अतिरिक्त कृषी अवशेषांपैकी १ लाख टन अवशेषांचा वापर करून सुमारे २५,००० टन बायोचार आणि ५०,००० पेक्षा अधिक कार्बन क्रेडिट्स निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे.
या प्रकल्पाविषयी शेतकऱ्यांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून आपल्या शंकांचे निरसन करुन घेतले. काही शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. प्रश्नोत्तर सत्राचे संचालन करार शेती विभागाचे प्रमुख गौतम देसर्डा यांनी केले. ज्ञानेश्वर शेंड यांनी सूत्रसंचालन केले. डॉ.अनिल ढाके यांनी आभार मानले.








