जळगाव, (प्रतिनिधी) : येथील कृषीसम्राट फाउंडेशन आणि भरारी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव जिल्ह्यातील पूरग्रस्त ५१ शेतकऱ्यांसाठी बियाणे, कीटकनाशके, खते तसेच दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. पुरामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना या संकटातून सावरण्यासाठी कृषीसम्राट फाउंडेशन आणि सनशाईन अॅग्रो यांच्या सहकार्याने बियाणे, खते व कीटकनाशके वितरित करण्यात आली. तसेच, दिवाळी सण जवळ आल्याने त्यांना फराळाचेही वाटप करण्यात आले.
रविवारी सकाळी झालेल्या या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या खासदार स्मिता वाघ यांनी भरारी फाउंडेशन शेतकरी संवेदना अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली आणि पूरस्थितीमुळे आलेल्या संकटात शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. आमदार सुरेश भोळे यांनीही या भीषण पूरस्थितीवर भाष्य करताना पूरग्रस्तांना या परिस्थितीतून सावरण्यासाठी ही छोटीशी मदत असल्याचे सांगितले आणि शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, असे आवाहन केले.
या मदतीसाठी जळगाव तालुक्यातील धानवड, उमाळे, सुभाषवाडी वराड, तसेच पाचोरा तालुक्यातील पिंपरी, घुसर्डी, शिंदाड आणि जामनेर तालुक्यातील नेरी दिगर येथील ५१ शेतकरी उपस्थित होते.
याप्रसंगी खासदार स्मिता वाघ यांच्यासह अनिश शहा, हर्ष चौधरी, रवींद्र लढ्ढा, डॉ. प्रसन्नाकुमार रेदासनी, नानासाहेब सुर्यवंशी, अनिकेत पाटील, आशिष भंडारी, आदेश ललवाणी, अॅड किशोर पाटील, सपन झुनझुनवाला, चित्रा चौधरी, सागर पगारीया, भगवान तिवारी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिपक जोशी, देवराज बोरसे, अक्षय सोनवणे, शिरीषकुमार तायडे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक बाळासाहेब सुर्यवंशी यांनी केले, सूत्रसंचालन दीपक परदेशी यांनी केले, तर आभार भूषण लाडवंजारी यांनी मानले.