एरंडोल, (प्रतिनिधी) : तालुक्यातील वरखेडे गावात एकाच कुटुंबातील पाच जणांचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. शेतात वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी लावलेल्या तारेच्या कुंपणाला रोहित्रातून वीजप्रवाह सोडल्याने ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. मात्र, दीड वर्षाची एक मुलगी या भीषण घटनेतून बचावल्याने हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना बुधवार, २० ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली, यामुळे संपूर्ण जळगाव जिल्हा हादरला आहे.
घटनेचा तपशील..
मध्यप्रदेशातील रहिवासी असलेले विकास रामलाल पावरा (वय ३५) हे कुटुंबासह रोजगारासाठी एरंडोल तालुक्यात आले होते. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांचा परिवार खेडी खडका परिसरातून एरंडोल शहराच्या दिशेने जात असताना, एका शेतकऱ्याच्या शेतातून जात होता. याच शेतात पिकांच्या संरक्षणासाठी तारेचे कुंपण लावून त्यात वीजप्रवाह सोडण्यात आला होता. याची कल्पना नसल्याने, विकास पावरा यांच्या कुटुंबातील पाच जणांना तारेचा जोरदार धक्का बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा वीजप्रवाह बॅटरीऐवजी थेट रोहित्रातून सोडल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली असावी.
या दुर्घटनेत विकास रामलाल पावरा (वय ३५), त्यांची पत्नी सुमन विकास पावरा (वय ३०), मुले पवन विकास पावरा आणि कंवल विकास पावरा, तसेच एक वृद्ध महिला (नाव अज्ञात) यांचा समावेश आहे. कुटुंबातील दीड वर्षाची मुलगी दुर्गा विकास पावरा मात्र सुदैवाने बचावली. घटनेची माहिती मिळताच, एरंडोल पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या प्रकरणी शेतमालक बंडू युवराज पाटील (वय ६४, रा. वरखेडी, ता. एरंडोल) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, डीवायएसपी विनायक मते, एलसीबी निरीक्षक संदीप पाटील, एरंडोलचे निरीक्षक निलेश गायकवाड, एपीआय रोहिदास गबाले आणि तहसीलदार प्रदीप पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. मृतांचे मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
ही घटना मानवी निष्काळजीपणाचे आणि सुरक्षेचे नियम पाळण्याचे महत्त्व अधोरेखित करते. वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्याच्या प्रयत्नात निष्पाप लोकांचा बळी गेल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.










