जळगाव, (जिमाका) : रिधुर-नांद्रा-चांदसर-कवठळ परिसरातील नागरिकांच्या वर्षानुवर्षांच्या मागणीनुसार नव्याने उभारण्यात आलेल्या पुलाचे लोकार्पण व विदगाव येथील ७५० महिलांना भांडे संच वाटप कार्यक्रमाचा यशस्वी आयोजन करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील उपस्थित होते.
पावसाळ्यात शेतकरी व ग्रामस्थांना होणाऱ्या त्रासावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शासनाच्या अर्थसंकल्पातून रु. २ कोटी ९ लाखांचा निधी मंजूर करून हा पूल उभारण्यात आला आहे. पुलाच्या लोकार्पणप्रसंगी पालकमंत्री म्हणाले, “हा पूल केवळ दळणवळणाचे साधन नसून, हा या भागातील ग्रामस्थांसाठी नवसंजीवनी ठरेल. ग्रामस्थांची जुनी मागणी पूर्ण झाली असून पावसाळ्यातील अडथळ्यांपासून आता मुक्ती मिळेल.”
तत्पूर्वी विदगाव येथे आयोजित कार्यक्रमात ७५० कामगार महिलांना भांडे संच वाटप करण्यात आले. “हा संच केवळ सहाय्य नव्हे, तर महिलांच्या कष्टाला दिलेला सन्मान आहे,” असे भावनिक उद्गार पालकमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. या उपक्रमाबद्दल महिलांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंचायत समितीच्या माजी सभापती ललिता जनाआप्पा कोळी यांनी केले. सूत्रसंचालन राजू कोळी यांनी केले, तर आभार प्रदर्शन जनाआप्पा कोळी यांनी मानले.
कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांमध्ये तालुकाप्रमुख शिवराज पाटील, सभापती जनाआप्पा कोळी, डॉ. कमलाकर पाटील, तुषार महाजन, जितू पाटील, सरपंच चुडामन कोळी, उपसरपंच राजू कोळी, महेंद्र कोळी, मुरलीधर कोळी, ज्ञानेश्वर कोळी, निलेश कोळी, गजानन सोनवणे, शालिक पाटील, सुनील पाटील, देवेंद्र कोळी, भगवान कुंभार, बळीराम कोळी यांचा समावेश होता. या कार्यक्रमाला विदगाव, नांद्रा, रिधुर, कानळदा परिसरातील शेतकरी, स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.