जळगाव, (प्रतिनिधी) : भारतात २५ जून १९७५ रोजी लागू करण्यात आलेल्या आणीबाणीला यंदा ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप युवा मोर्चातर्फे जळगाव येथे मॉक पार्लियामेंट, विशेष माहितीपर प्रदर्शनी आणि सत्याग्रहींच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश तरुण पिढीला आणीबाणी काळातील घटनात्मक व्यत्ययाची माहिती देऊन जागरूकता निर्माण करणे हा होता.
या पार्श्वभूमीवर भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आलेल्या या मॉक पार्लियामेंटमधून युवकांना त्या काळाची जाणीव व्हावी, लोकशाही मूल्यांची जपणूक व्हावी आणि राष्ट्रहिताचे भान निर्माण व्हावे, हा उद्देश होता. मॉक पार्लमेंटमध्ये न्यायाधीश म्हणून विश्वासराव कुलकर्णी आणि दीपमाला काळे यांनी न्यायपूर्ण पद्धतीने भूमिका पार पाडली.
कार्यक्रमात युवकांनी प्रत्यक्ष संसद कार्यप्रणालीसारखी मांडणी करत तात्कालिक परिस्थितीवर अभ्यासपूर्ण चर्चा केली. त्याचबरोबर “आपत्कालीन काळातील घटना व संघर्ष” या विषयावर आधारित माहितीपर प्रदर्शनीचे उद्घाटन आमदार सुरेश भोळे (राजू मामा) यांच्या हस्ते पार पडले. तसेच, आणीबाणी काळात शिक्षा भोगलेल्या सत्याग्रही विश्वासराव कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास आमदार सुरेश भोळे, भाजप जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्षा भैरवी वाघ पलांडे, प्रदेश उपाध्यक्ष अमित सोलंकी तसेच भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धात्मक सत्रात गौरव पाटील याने प्रथम पारितोषिक पटकावले, तर द्वितीय क्रमांक नचल लालवाणी, अनिरुद्ध ठाकूर आणि विशाल पवार यांनी मिळवला. तसेच उत्तेजनार्थ पुरस्कार हर्षा ओसानी व दीपक पाटील यांना देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संयोजन समितीमध्ये अश्विन सैंदाणे, अक्षय जेजुरकर, स्वप्निल चौधरी, गजानन वंजारी, हर्षल सीतपाल, उन्मेष चौधरी, विकी चौधरी, गौरव पाटील, रोहित सोनवणे, विशाल सोनार आणि भाजप युवा मोर्चा चे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी योगदान दिले.