जळगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील वाकडी येथील एका तरुणाने शेतामध्ये झाडाला गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवार दि. १३ मे रोजी सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते.
अमोल वाल्मीक पाटील (वय २१, रा.वाकडी ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो गावामध्ये आई-वडील, दोन भाऊ यांच्यासह राहत होता. वडील शेती काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत आहेत. तर अमोल हा देखील वडिलांना शेतीकामात मदत करत होता. दरम्यान सोमवारी दि. १२ मे रोजी रात्री जेवण झाल्यानंतर अमोल पाटील हा शेताकडे गेला होता. मात्र तो घरी परतला नव्हता. सकाळी अमोल पाटील याने त्याच्या शेताच्या बाजूला असलेल्या दुसऱ्या शेतामध्ये कडुनिंबाच्या झाडाखाली गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ग्रामस्थांच्या लक्षात आली.
तातडीने त्याला जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून अमोल पाटील याला मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. तरुण मुलगा मृत झाल्यामुळे वाकडी गावांमध्ये शोककळा पसरली आहे. घटनेची एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते.








