चोपडा, (प्रतिनिधी) : शहरातील रहिवासी आणि मणिपुरमध्ये सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) कार्यरत असलेला जवान मणिपूर मधील एका अपघातात जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
चेतन पांडुरंग चौधरी (वय ३२) असे शहीद झालेल्या जवानाचे नाव आहे. चेतन पांडुरंग चौधरी हे गेल्या १२ वर्षांपासून सीमा सुरक्षा दलात कार्यरत होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी तसेच आई-वडील, एक भाऊ आणि बहिण असा परिवार आहे. मणिपूर राज्यातील अतिसंवेदनशील भागात ३७ बीएन बीएसफची तुकडी कार्यरत होती. दरम्यान, ड्युटीवरून परत येत असताना दि. ११ मार्च रोजी इम्फाळ-दिमापूर राष्ट्रीय महामार्गावरील सेनापती जिल्ह्यातील चांगौबुंग या गावात ट्रक दरीत कोसळल्याने २ जवानांचा जागीच तर एका जवानाचा रूग्णालयात नेत असताना मृत्यू झाला होता.
यासोबतच इतर १३ जखमी जवानांवर इम्फाळमधील रूग्णालयात उपचार सुरू होते. तसेच जखमी जवानांमध्ये जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरातील रहिवासी चेतन पांडुरंग चौधरी यांचा समावेश होता. गेल्या चार दिवसांपासून चेतन चौधरी यांच्यावर उपाचार सुरू होते. मात्र, आज १५ मार्च रोजी सकाळी त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली आणि त्यांनी उपचारदरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, चेतन चौधरी शहिद झाल्यामुळे जळगाव जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.