जळगाव, (प्रतिनिधी) : होळी सण म्हटला की, झाड वृक्षांची तोड केली जाते. मात्र मेहरुण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील मुलांनी अनोखी होळी साजरी केली.
दरम्यान विद्यार्थ्यांनी परिसरातील स्वच्छता व झाडांच्या संवर्धनास प्राधान्य दिले आहे. शाळा परिसरातील कचरा एकत्र करीत त्याला अग्नी देत आपल्यातील दुर्गुणांची होळी करण्याची शपथ घेतली. शाळेतील चिमुकल्या विद्यार्थिनींनी होळीची पूजा करीत झाड संवर्धनाचा निर्धार केला.
शाळेतील मुलांनी यावर्षी साजरी केलेली होळी आदर्शवत ठरली आहे. समाजाला जागृत करून बदलत्या परिस्थितीनुसार अशाप्रकारे होळी साजरी केली पाहिजे, यातून समाज आणि निसर्ग हितही जपले जाईल, याचे उदाहरण देण्यात आले असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी बोलताना सांगितले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना वृक्ष संवर्धन करण्याची शपथ शिक्षिका रूपाली आव्हाड यांनी दिली. मुलांच्या या आगळ्यावेगळ्या होळीचे सर्वत्र कौतुक होत आहे. होळीचे महत्त्व कविता सानप यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल कोळी यांनी केले. कार्यक्रमास सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.