मुंबई (वृत्तसंस्था ) : उपमुख्यमंत्री आणि बारामती विधानसभेचे विद्यमान आमदार अजित पवार यांनी आगामी विधानसभा निवडणूक न लढवण्याची थेट संकेत दिले आहेत. यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
तसेच जो कोणी दुसरा आमदार होईल त्याची आणि माझ्या कामाची तुलना करा असं अजित पवारांनी म्हंटल आहे. आज बारामतीमध्ये एका कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी आपल्या भाषणातून खळबळ उडवून दिली आहे. तसेच इतकी विकासकामे करूनही बारामती लोकसभेत आमचा पराभव झाला अशी खंतही अजित पवारांनी मांडली.
अजित पवार म्हणाले, आपण लाखोंच्या मतांनी निवडून येणारी माणसे आहोत. मी आता ६५ वर्षांचा झालो आहे. मी समाधानी आहे. मात्र जेथे पिकते तेथे विकत नाही. त्यामुळे बारामतीला माझ्याशिवाय नेतृत्व मिळालं पाहिजे. बारामतीकरांना मी सोडून आमदार मिळाला पाहिजे. त्यानंतर १९९१ ते २०२४ च्या काळात माझ्या कारकिर्दीची आणि त्याच्या कारकिर्दीची तुलना करा. बारामतीकराना सगळं काही न मागता मिळालं. न सांगता रस्ता होतोय, न सांगता पिण्याच्या पाण्याच्या योजना होतात, आजही कितीतरी कोटींच्या योजनांची कामं सुरु आहेत. यापूर्वी बारामती तालुक्यातील रस्ते कसे होते. आता कसे आहेत? असा सवालही अजित पवारांनी केला.
अजित पवार पुढे म्हणाले, बारामती शहर असो गावं असतील आपण विकास करत आहोत. विकास कामांना प्राधान्य कसं देता येईल हे आपण पाहिलं पाहिजे. काही चूकत असेल तर मला सांगा. महाराष्ट्रात पाच वर्षात एवढी कामे झाली नसेल तेवढी बारामतीत झाली. एक वर्ष कोरोनात गेलं आणि एक वर्ष सत्तेत नव्हतो. नाही तर आणखी कामे झाली असती. मला एका गोष्टीची जाणीव आहे, कार्यकर्त्यांच्या जोरावर पक्ष चालतो. कार्यकर्ता पक्षाचा कणा असतो. त्या कण्यानं काम नाही केलं तर गडबड होते हे मान्य केलं पाहिजे. कोणतीही निवडणूक असो, त्या निवडणुतील यश हे कार्यकर्त्यांच्या जिवावर अवलंबून असते.