जळगाव, (प्रतिनिधि ) ;– शहरापासून जवळ असलेल्या खेडी खुर्द येथे राहणारा तरूण शेतकरी हा बैलांना पाणी पाजण्यासाठी गिरणानदीत गेला असता पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना मंगळवारी २७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता उघडकीस आली आहे. याबाबर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ईश्वर सोमा कोळी वय-३२ रा. खेडी खुर्द ता. जळगाव असे मयततरूण शेतकऱ्याचे नाव आहे.
ईश्वर कोळी हा तरूण आपल्या आईवडील, भाऊ व वहिनी यांच्यासोबत खेडी खुर्द गावात वास्तव्याला होता. शेतीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. खेडी खुर्द शिवारातील गिरणा नदी काठावर त्यांचे शेत आहे. नेहमीप्रमाणे सोमवारी २६ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास ते बैलांना पाणी पाजण्यासाठी गिरणीनदीत गेला असता त्यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने ईश्वर कोळी हा पाण्यात पडला. त्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला.
दरम्यान दोन्ही बैल हे सायंकाळी ५ वाजता घरी आले. परंतू ईश्वर कोळी सोबत नव्हता. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी त्याचा रात्री उशीरापर्यंत सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. दुसऱ्या दिवशी मंगळवारी २७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता शेत शिवारातील गिरणा नदीपात्रात ईश्वरचा मयतस्थितीत मृतदेह आढळून आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह नेण्यात आला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ मुदस्सर काझी हे करीत आहे.