जळगाव, दि.०५ – जळगाव शहरातील रस्त्यांसाठी महाराष्ट्र शासनाकडून बहूप्रतीक्षित असलेला१०० कोटी रुपयांचा निधी अखेर मंजूर झाला आहे. पहिल्या टप्प्यात राज्य शासनाकडून ५० कोटी रुपये निधी प्राप्त होणार आहे. शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी यासाठी राज्य शासनाकडे यशस्वी पाठपुरावा केला होता. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना जळगाव शहराच्या विकासासाठी १०० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली होती.
मात्र त्यानंतर काही वर्ष लोटली तरी जळगाव शहराला निधी मिळाला नव्हता. हा निधी मिळवण्यासाठी आमदार राजूमामा भोळे यांनी पाठपुरावा सुरू ठेवला होता. अखेर बुधवारी ५ एप्रिल रोजी राज्य शासनाकडून १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्यातील ५०% निधी पहिल्या टप्प्यात वितरित करण्यात येणार आहे. या निधीअंतर्गत जळगाव शहरातील रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण केले जाणार आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि ग्रामविकास मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांचे निधी मिळवून देण्यासाठी मोठे सहकार्य लाभले, अशी माहिती आ.राजूमामा भोळे यांनी दिली.
राज्य शासनाने काढलेल्या जीआर मध्ये म्हटले आहे की, सदर प्रकल्प खर्चाचा १००% हिस्सा राज्य शासनाचा राहणार आहे. प्रकल्प अंतर्गत निश्चित करण्यात आलेल्या कामांचा कामांना प्रकल्प खर्चाच्या मर्यादेत सक्षम प्राधिकार्यांची तांत्रिक मान्यता प्राप्त झाली याची खातरजमा जिल्हाधिकाऱ्यांनी करायचे आहे. प्रकल्पाअंतर्गत कार्यान्वयन यंत्रणा सार्वजनिक बांधकाम विभागाची राहणार आहे. निविदा प्रक्रियेद्वारे कामकाज चालेल.
सदर प्रकल्प अंतर्गत असणारी कामे ही सार्वजनिक मालकीच्या ठिकाणीच करावीत याची खातरजमा करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांची आहे. सदर प्रकल्प अंतर्गतची कामे शहर विकास नियंत्रण नियमावली व विकास आराखड्याशी सुसंगत असल्याबाबत खातरजमा करणे हे जिल्हाधिकाऱ्यांचे काम राहील. या अंतर्गत उपलब्ध करून दिलेला निधी त्याच उद्दिष्टासाठी खर्च करण्यात येत असल्याचे तसेच काम गुणवत्तेनुसार झाले आहे किंवा कसे तसेच मंजूर कामावरच मंजूर निधी खर्च होत आहे का हे पाहण्याची देखील जबाबदारी ही जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेली आहे. त्यामुळे जळगाव शहरातील नागरिकांना आता पक्के आणि चांगले रस्ते मिळवून देण्याची जबाबदारी ही महानगरपालिका तसेच जिल्हा प्रशासनाची राहणार आहे.