गजानन पाटील | अमळनेर, दि.१९ – येथील मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे ग्रामीण भागात पिक विमा जनजागृती रथयात्रा मंगळवारी काढण्यात आली. तालुक्यातील नागरिकांमध्ये पिक विमा बाबत जनजागृती करण्यासाठी ही रथयात्रा काढण्यात आली असून १० दिवसांत तालुक्यातील १५४ गावांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.
संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले व तालुक्यातील हिंगोणे बुद्रुक येथील प्रगतिशील शेतकरी अजयसिंग पाटील यांनी रथाचे विधिवत पूजन केले. तसेच खजिनदार गिरीश कुलकर्णी व कृषी विभागाचे दीपक चौधरी यांनी मंगळदेव ग्रह मंदिराचा भगवा ध्वज दाखवून रथयात्रेला सुरवात केली. यावेळी सुरूवातीला काही अंतरापर्यंत सवाद्य मिरवणूक देखील काढण्यात आली. संस्थेतर्फे दरवर्षी शेतकऱ्यांच्या कल्याणार्थ तथा मार्गदर्शनार्थ अनेकविध कार्यक्रम राबविले जातात.
पीक विम्या विषयी अजूनही शेतकऱ्यांमध्ये फारसा जनजागर नाही. पीक विम्याच्या फायद्यांबाबत त्यांना फारशी माहिती नाही. शेतकऱ्यांना ही माहिती व्हावी , दुर्दैवाने शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास त्यांना भरपाई मिळावी, यासाठी जनसेवार्थ रथाचे आयोजन केले आहे. कृषी विभाग यासाठी संस्थेला सहकार्य करीत आहे.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष एस.एन. पाटील, सचिव एस.बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, सेवेकरी विनोद कदम, सुबोध पाटील, कृषी कार्यालयाचे नवल पाटील आदी उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते आशिष चौधरी यांनी रथासाठी त्यांचे वाहन उपलब्ध करून दिले.