पारोळा, प्रतिनिधी : तालुक्यातील शिवरे येथे आयोजित ग्रामसभेत शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या ग्रामसेवकावर वाद घालून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पारोळा पोलिसांनी अवघ्या काही तासांत एका मुख्य आरोपीला अटक केली आहे. या दुर्दैवी घटनेप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०५ अन्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, १७ ऑगस्ट २०२६ रोजी शिवरे येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेदरम्यान शासकीय कामकाज पाहत असलेले ग्रामसेवक प्रल्हाद पाटील (वय ५२) यांच्याशी जुन्या बिलांच्या कारणावरून काही ग्रामस्थांनी हुज्जत घालत तीव्र वाद घातला. वादाचे रूपांतर थेट भांडणात होऊन सात जणांनी त्यांना शिवीगाळ केली. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळून जात असताना ग्रामसेवक प्रल्हाद पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच पारोळा पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी विलंब न लावता संबंधित सात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद क्रमांक ३१५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम १०५ (सदोष मनुष्यवध) अंतर्गत गुन्हा दाखल केला.

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी अत्यंत वेगाने तपासाची चक्रे फिरवत या प्रकरणातील एका मुख्य आरोपीस तात्काळ अटक केली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
दरम्यान, मृत ग्रामसेवक प्रल्हाद पाटील यांच्या पार्थिवावर १८ ऑगस्ट २०२६ रोजी त्यांच्या बोधर्दे (ता. पारोळा) या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. गावात कोणताही अनचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पारोळा पोलिसांकडून शिवरे व बोधर्दे परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.









