जळगाव, (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील गेल्या १२ वर्षांचा कार्यकाळ हा देशाचा चेहरामोहरा आणि भवितव्य बदलणारा ठरला आहे. लोकांचा अढळ विश्वास आणि सरकारच्या सेवाभावी वृत्तीमुळे या काळात देशाने ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास’ या मंत्राला जनआंदोलनाचे रूप दिले असून, जवळपास २५ कोटी जनता दारिद्र्यरेषेच्या वर आली आहे, अशी माहिती केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे (राजूमामा), महापौर दीपमाला काळे, राधेश्याम चौधरी, विजय वानखेडे, मनोज भंडारकर यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना ना. रक्षा खडसे म्हणाल्याकी,
या १२ वर्षांच्या प्रवासात तंत्रज्ञान आणि डिजिटल प्रशासनाच्या जोडीने थेट बँक खात्यात पैसे पाठवून लाखो बनावट लाभार्थी हटवण्यात आले, ज्यामुळे देशाच्या तिजोरीची ४.३१ लाख कोटी रुपयांची बचत झाली. सर्जिकल स्ट्राईक आणि हवाई हल्ल्यांसारख्या कारवायांनी भारताची अंतर्गत व सीमा सुरक्षा मजबूत केली असून, देश आता नक्षलवादापासून मुक्त होत ‘ग्रीन ग्रोथ झोन’कडे वाटचाल करत आहे.
जनकल्याण आणि सर्वसमावेशक विकास..
गेल्या १२ वर्षांत सर्वसामान्य, गरीब आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले. जन धन योजनेअंतर्गत ५८ कोटींहून अधिक बँक खाती उघडण्यात आली, तर ८१ कोटी नागरिकांना मोफत रेशन आणि ६० कोटींहून अधिक लोकांना आयुष्मान भारतचे आरोग्य कार्ड देण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजनेतून ४ कोटींहून अधिक पक्की घरे, उज्ज्वला योजनेतून ११ कोटी मोफत गॅस कनेक्शन आणि जल जीवन मिशनद्वारे १६ कोटींहून अधिक ग्रामीण कुटुंबांना नळाचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
शेतकऱ्यांसाठी ‘पीएम किसान सन्मान निधी’ अंतर्गत ४.३ लाख कोटी रुपये थेट खात्यात जमा झाले असून किसान क्रेडिट कार्डची मर्यादा ३ लाखांवरून ५ लाख रुपये करण्यात आली आहे. मध्यमवर्गीयांना दिलासा देत कर सवलतीची मर्यादा १२.७५ लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. महिला सक्षमीकरणासाठी ‘लखपती दीदी’ आणि ‘सुकन्या समृद्धी’ योजना मैलाचा दगड ठरल्या आहेत.
पायाभूत सुविधांचा महावेग..
दळणवळण आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात देशात अकल्पनीय क्रांती झाली आहे:
रस्ते विकास: गेल्या १२ वर्षांत ४ लाख किलोमीटरचे पक्के रस्ते बांधण्यात आले. राष्ट्रीय महामार्गांचे जाळे ९१,२८७ किमीवरून १.४६ लाख किमीवर पोहोचले असून, महामार्ग बांधणीचा वेग आता प्रतिदिवस ३४ किमी झाला आहे.
रेल्वे व मेट्रो: भारतीय रेल्वेचे ९९.६% ब्रॉडगेज विद्युतीकरण पूर्ण झाले असून १६४ हून अधिक ‘वंदे भारत एक्सप्रेस’ धावत आहेत. तसेच २६ हून अधिक शहरांमध्ये १,०९५ किमीचे मेट्रो नेटवर्क कार्यान्वित झाले आहे.
विमानतळे: देशातील विमानतळांची संख्या ७४ वरून १६४ च्या पार गेली असून ‘उडान’ योजनेमुळे सर्वसामान्यांना विमानप्रवासाची संधी मिळाली आहे.
कृषी सिंचन: ‘थेंब थेंबाने अधिक पीक’ मोहिमेअंतर्गत १०९ लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतजमीन सूक्ष्म सिंचनाखाली आणण्यात आली आहे.
सांस्कृतिक वारसा आणि जागतिक ओळख..
सरकारने विकासासोबतच देशाच्या सांस्कृतिक अस्मितेचे संवर्धन केले आहे. राजपथचे ‘कर्तव्य पथ’ असे नामकरण, नवीन संसद भवन, स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि राष्ट्रीय युद्ध स्मारकाची उभारणी यातून गुलामगिरीची मानसिकता मोडीत काढली आहे. ‘हर घर तिरंगा’ आणि ‘एक पेड माँ के नाम’ सारख्या उपक्रमांनी १४० कोटी नागरिकांना एकत्र आणले.
जागतिक स्तरावर ‘लस मैत्री’च्या माध्यमातून ९९ देशांना मदत करत भारताने ‘उपाय-प्रदाता राष्ट्र’ म्हणून ओळख निर्माण केली आहे. जी-२० चे यशस्वी अध्यक्षपद, ७० लाख कोटींहून अधिक थेट परकीय गुंतवणूक (FDI) आणि ३८ देशांसोबतचे व्यापार करार भारताच्या वाढत्या जागतिक प्रभावाचे दर्शन घडवतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताच्या इतिहासातील सर्वाधिक काळ पदावर राहिलेले निर्वाचित पंतप्रधान बनले असून, ७५% पसंती रेटिंगसह ते जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरले आहेत. हा १२ वर्षांचा प्रवास समृद्ध, सुरक्षित आणि आत्मनिर्भर भारताची भक्कम पायाभरणी करणारा ठरला आहे.








