जळगाव, (प्रतिनिधी) : लग्नामध्ये झालेल्या किरकोळ वादाचे पर्यावसान दोन गटांमधील भीषण हाणामारीत झाल्याची धक्कादायक घटना जळगाव जवळील नशिराबाद येथे घडली आहे. या वादात दोन्ही गटांकडून एकमेकांवर तलवार, लोखंडी पाईप आणि आसाारीने (धारदार हत्यार) जीवघेणा हल्ला करण्यात आला. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूंच्या परस्परांविरोधी तक्रारींवरून एकूण ८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना ६ जून रोजी घडली असून यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नशिराबाद येथे एका विवाह सोहळ्यादरम्यान दोन गटात वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरून दोन्ही गट आमनेसामने आले आणि त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली.
याप्रकरणी पहिली फिर्याद सय्यद वसीम सय्यद बिस्मिल्ला (वय ३४, रा. नशिराबाद, ता. जळगाव) यांनी दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, ६ जून रोजी लग्नाच्या जेवणाच्या पंगतीत त्यांचा लहान भाऊ झाडत (सफाई करत) असताना, त्याने तिथे उभे असलेल्या एका व्यक्तीला बाजूला होण्यास सांगितले. यावरून तिथे उपस्थित असलेल्या काही जणांनी वाद घालत त्यांना बेदम मारहाण केली. एवढेच नव्हे तर तलवार आणि आसारीसारख्या घातक हत्यारांनी त्यांच्यावर वार करून जखमी केले. या तक्रारीवरून नशिराबाद पोलिसांनी दुसऱ्या गटातील चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याच घटनेप्रकरणी दुसरी परस्परांविरोधी फिर्याद मोहम्मद रफीक अब्दुल हक (वय ४६, रा. नशिराबाद, ता. जळगाव) यांनी दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, लग्नात झालेल्या जुन्या वादाच्या कारणावरून दुसऱ्या गटातील चार जणांनी त्यांना रस्त्यात अडवून बेदम शिवीगाळ केली. तसेच लोखंडी पाईपने त्यांच्यावर जबर हल्ला चढवून गंभीर मारहाण केली. या फिर्यादीवरून पोलिसांनी पहिल्या गटातील चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
लग्नातील आनंदाच्या वातावरणात झालेल्या या रक्तरंजित हाणामारीमुळे नशिराबाद परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूंच्या एकूण ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास नशिराबाद पोलीस करत आहेत.







