जळगाव, (प्रतिनिधी) : ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेला खऱ्या अर्थाने बळकटी देत जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात सध्या ‘जलक्रांती’चा धडाका सुरू आहे. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या वतीने आणि प्रतापराव पाटील यांच्या विशेष सहकार्याने मतदारसंघातील शेतशिवारांमधून वाहणाऱ्या नदी व नाल्यांमधील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. या महत्त्वाकांक्षी उपक्रमामुळे ग्रामीण भागातील जलस्रोत मोकळा श्वास घेत असून, परिसराचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटण्यास मोठी मदत होणार आहे.
गाळमुक्त नदी-नाले: ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ संकल्पना प्रत्यक्षात!
वर्षानुवर्षे साचलेल्या गाळामुळे नदी आणि नाल्यांची पाणी साठवण क्षमता कमालीची घटली होती. परिणामी, पावसाळ्यात पाणी वाहून जात होते आणि उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. हीच गंभीर बाब ओळखून ना. गुलाबराव पाटील यांनी मतदारसंघात गाळ उपशाची धडक मोहीम सुरू केली. या उपक्रमामुळे नदी-नाल्यांमधील साचलेला गाळ निघाल्याने पाण्याच्या प्रवासातील अडथळे दूर झाले आहेत. यामुळे भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यास (Groundwater Recharge) मोठी मदत होणार आहे.
आगामी पावसाळ्यात शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा..
या जलक्रांती मोहिमेचे दूरगामी सुवर्ण परिणाम यंदाच्या पावसाळ्यापासूनच पाहायला मिळणार आहेत. गाळ निघाल्यामुळे नदी-नाल्यांमध्ये पावसाच्या पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणावर वाढेल. परिसरातील विहिरी आणि कूपनलिकांची (बोरवेल) पाणीपातळी उंचावण्यास मदत होईल. शेतकरी बांधवांना रब्बी आणि उन्हाळी पिकांच्या सिंचनासाठी हक्काचे पाणी उपलब्ध होणार असल्याने, त्यांच्या उत्पादनात भरघोस वाढ होईल.
हा उपक्रम केवळ एका विकासकामापुरता मर्यादित नसून, तो शेतकऱ्यांच्या समृद्धीचा मार्ग आहे. मतदारसंघात सुरू असलेल्या या जलक्रांतीच्या पार्श्वभूमीवर, जळगाव ग्रामीणमधील तमाम शेतकरी व ग्रामस्थांतर्फे ना. गुलाबराव पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत.







