जळगाव, (प्रतिनिधी) : वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण आणि पाण्याची वाढती टंचाई लक्षात घेता सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प (STP) आणि ‘झिरो लिक्विड डिस्चार्ज’ (ZLD) तंत्रज्ञानाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर, पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकत जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने सांडपाण्याचे शुद्धीकरण करून त्याचा पुनर्वापर करण्याची आधुनिक प्रणाली यशस्वीपणे कार्यान्वित केली आहे. संस्थेचा हा पुढाकार सांडपाणी व्यवस्थापन आणि जलसंधारणासाठी एक आदर्श वस्तुपाठ ठरत आहे.
काय आहे एसटीपी आणि झेडएलडी तंत्रज्ञान?
एसटीपी म्हणजे घरगुती, हॉस्पिटल, हॉटेल तसेच औद्योगिक सांडपाणी शुद्ध करून ते पुन्हा वापरण्यायोग्य बनवण्याची प्रक्रिया होय. या प्रक्रियेमध्ये स्क्रीनिंग, सेडीमेंटेशन, बायोलॉजिकल ट्रीटमेंट, एरेशन, क्लॅरिफिकेशन आणि डिसइन्फेक्शन अशा विविध टप्प्यांचा समावेश असतो. या माध्यमातून पाण्यातील घनकचरा, सेंद्रिय घटक आणि जंतू दूर करून स्वच्छ पाणी तयार केले जाते. हे शुद्ध केलेले पाणी बागकाम, फ्लशिंग, कूलिंग आणि इतर उपयोगांसाठी पुन्हा वापरता येते, ज्यामुळे पाण्याचा खर्च कमी होऊन पर्यावरण संरक्षणाला मोठा हातभार लागतो.
या प्रणालीसोबतच महाविद्यालयात ‘झिरो लिक्विड डिस्चार्ज’ (ZLD) ही आधुनिक प्रणाली कार्यरत करण्यात आली आहे. या तंत्रज्ञानामध्ये सांडपाण्याचा एकही थेंब बाहेर सोडला जात नाही, तर संपूर्ण पाणी शुद्ध करून त्याचा पुनर्वापर केला जातो. झेडएलडी प्रक्रियेत प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक शुद्धीकरणानंतर रिव्हर्स ऑस्मोसिस (RO) आणि इव्हॅपोरेशन (बाष्पीभवन) प्रक्रियेद्वारे उरलेले द्रव्य पूर्णपणे वेगळे केले जाते. या तंत्रज्ञानामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होते आणि प्रदूषणावर संपूर्ण नियंत्रण मिळवता येते. विशेषतः केमिकल, फार्मा आणि टेक्सटाईल उद्योगांमध्ये याचा वापर वाढत असला, तरी या प्रकल्पासाठी मोठा खर्च, नियमित देखभाल आणि तांत्रिक कौशल्य आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
तज्ज्ञांच्या टीमचे महत्त्वपूर्ण योगदान..
हा आधुनिक आणि गुंतागुंतीचा प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यासाठी महाविद्यालयातील तज्ज्ञांच्या टीमने अहोरात्र परिश्रम घेतले. या प्रकल्पामध्ये संजय भिरूड, उमाकांत भिरूड, परेश पाटील, हितेंद्र चौधरी, नरेंद्र भिरूड, पराग राणे, नोमेश कुरकुरे, रितेश बोंडे, श्रीराम बारेला, घनश्याम पाचपांडे, निखिल पाटील, विशाल भोसांडे, रुपेश भदाणे, हर्षल वाघ, शैलेंद्र फालक, भावेश सोनवणे आणि उमेश धायडे यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
या सर्व सहकाऱ्यांच्या तांत्रिक कौशल्य, चोख नियोजन आणि योग्य समन्वयामुळेच हा ‘झिरो डिस्चार्ज’ एसटीपी प्रकल्प प्रत्यक्षात येऊ शकला आहे. भविष्यातील पाण्याच्या भीषण संकटावर मात करण्यासाठी आणि शाश्वत विकासासाठी अशा प्रणालींचा व्यापक वापर करणे ही काळाची गरज असल्याचे मत आता तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.








