जळगाव, (प्रतिनिधी) : एस.टी. बसमध्ये चढत असताना प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील ३० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत लांबविल्याची धक्कादायक घटना जळगाव येथील नवीन बसस्थानक परिसरात घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, बसस्थानक परिसरात चोरटे पुन्हा सक्रिय झाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील वर्दी येथील रहिवासी रमण कौतिक पाटील (वय ७०) आणि त्यांच्या पत्नी यमुनाबाई रमण पाटील हे जळगाव येथील एका रुग्णालयात दाखल असलेल्या त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीला पाहण्यासाठी आले होते. रुग्णाची भेट घेतल्यानंतर हे दांपत्य घरी परत जाण्यासाठी जळगाव येथील नवीन बसस्थानकावर आले. २२ मे रोजी नवीन बसस्थानकातून चोपडा येथे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना प्रवाशांची प्रचंड गर्दी होती.
याच गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी यमुनाबाई पाटील यांच्या गळ्यातील ९ ग्रॅम वजनाची आणि सुमारे ३० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत अत्यंत चालाखीने लांबविली. बसमध्ये चढल्यानंतर काही वेळातच हा प्रकार यमुनाबाई यांच्या लक्षात आला. त्यांनी तातडीने ही बाब आपले पती रमण पाटील यांना सांगितली. त्यांनी तात्काळ बसस्थानक आणि आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला, मात्र चोरट्यांचा आणि सोन्याच्या पोतीचा कुठेही पत्ता लागला नाही.
धक्क्याने महिलेची प्रकृती खालावली..
कष्टाची सोन्याची पोत चोरीला गेल्याचे समजताच यमुनाबाई पाटील यांना मोठा धक्का बसला. या धक्क्यामुळे त्यांची प्रकृती अचानक खालावली. त्यामुळे हवालदिल झालेले हे वृद्ध दांपत्य तक्रार न करताच थेट आपल्या गावी घरी निघून गेले. त्यानंतर, या धक्क्यातून सावरत रमण पाटील यांनी २३ मे रोजी जळगाव गाठून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली. पाटील यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.







