जळगाव, (प्रतिनिधी) : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषद जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीची अधिकृत घोषणा केली असून, जिल्ह्यात १८ मे २०२६ पासून निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी रोहन घुगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
या निवडणुकीच्या जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार, २५ मे रोजी अधिसूचना जारी केली जाईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १ जून असून, २ जून रोजी अर्जांची छाननी होईल. ४ जूनपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येतील. गुरुवार, १८ जून रोजी सकाळी ८:०० ते सायंकाळी ४:०० या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडेल, तर सोमवार, २२ जून रोजी जिल्हास्तरावर मतमोजणी होऊन निकाल घोषित केला जाईल. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया २५ जूनपूर्वी पूर्ण केली जाणार आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी रोहन घुगे तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे कामकाज पाहत आहेत. उमेदवारांना जिल्हाधिकारी कार्यालयातील दालनात कार्यालयीन दिवशी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज सादर करता येतील. या निवडणुकीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना १०,००० रुपये, तर अनुसूचित जाती व जमातीच्या उमेदवारांना ५,००० रुपये अनामत रक्कम (डिपाझिट) ठेवावी लागणार आहे. तसेच उमेदवाराचे नाव महाराष्ट्रातील कोणत्याही विधानसभा मतदारसंघात असणे बंधनकारक आहे.
या निवडणुकीत जळगाव महानगरपालिकेचे कार्यरत सदस्य, जिल्ह्यातील १५ नगरपरिषदा व ४ नगरपंचायतींचे निर्वाचित व स्वीकृत असे एकूण ६३० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतपत्रिकेद्वारे पसंती क्रमाने हे मतदान होणार असून, त्यासाठी जिल्ह्यात ७ मतदान केंद्रे प्रस्तावित करण्यात आली आहेत. निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून स्वतंत्र निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे.
दरम्यान, ‘महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट १९९५’ नुसार विनापरवाना सार्वजनिक किंवा खाजगी मालमत्तेवर पोस्टर्स, बॅनर लावणे, भिंती रंगवणे किंवा झेंडे लावण्यास कडक बंदी घालण्यात आली आहे. असे आढळल्यास संबंधित व्यक्ती ३ महिन्यांपर्यंतचा तुरुंगवास किंवा २ हजार रुपये दंड अथवा दोन्ही शिक्षेस पात्र राहील. त्यामुळे राजकीय पक्षांनी त्वरित अशी अनधिकृत फलके व पोस्टर्स काढून घ्यावेत, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने मतमोजणीचे ठिकाण आणि सुरक्षा कक्ष जिल्हास्तरावर प्रस्तावित करण्यात आले असून, आवश्यक जम्बो बॅलेट बॉक्सची व्यवस्था करण्यात आली आहे.







