जळगाव, (प्रतिनिधी) : दारूच्या नशेत सतत होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून एका ५० वर्षीय महिलेने आपल्या पतीची गळा आवळून हत्या केल्याची खळबळजनक घटना जळगावमध्ये उघडकीस आली आहे. भरत नामदेव पाटील (वय ५८, रा. केसी पार्क) असे मृताचे नाव असून, याप्रकरणी पत्नी मनीषा पाटील हिच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत भरत पाटील हे व्यसनाच्या आहारी गेले होते. त्यांनी दारूसाठी राहते घरही विकले होते आणि ते सतत पत्नी व मुलांना त्रास देत असत. मंगळवारी (५ मे) रात्री १० च्या सुमारास भरत पाटील यांनी पुन्हा दारूच्या नशेत पत्नीशी वाद घातला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. संतापाच्या भरात मनीषा यांनी दोरीने पतीचा गळा आवळून त्यांना पलंगावरून खाली ओढले. यात डोक्याला गंभीर दुखापत होऊन आणि गळा आवळल्या गेल्याने भरत यांचा मृत्यू झाला.
सुरुवातीला या घटनेची नोंद ‘अकस्मात मृत्यू’ म्हणून करण्यात आली होती. मात्र, मृतदेहाच्या गळ्यावरील खुणा पाहून पोलिसांना संशय आला. शवविच्छेदन अहवालात गळा आवळल्यामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केली असता, मनीषा पाटील यांनी सततच्या त्रासाला कंटाळून ही हत्या केल्याची कबुली दिली.







