जामनेर, (प्रतिनिधी) : जामनेर तालुक्यातील पळासखेडा (मीराचे) शिवारात बुधवारी रात्री वादळी वाऱ्यामुळे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. चिंचेचे मोठे झाड झोपडीवर कोसळल्याने रियानीबाई शांतीलाल बारेला (वय-३५) या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत त्यांचे पती, दोन मुले आणि भावाचा मुलगा असे चार जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील रहिवासी असलेले बारेला कुटुंब गेल्या १० वर्षांपासून पळासखेडा मीराचे येथील प्रकाश बाबुराव विचारे यांच्या शेतात चिंचेच्या झाडाखाली झोपडी करून राहत होते आणि शेतीचे काम करत होते. बुधवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे त्यांच्या झोपडीजवळ असलेले चिंचेचे मोठे झाड झोपडीवर कोसळले.
यावेळी झोपडीत आश्रय घेतलेल्या रियानीबाई बारेला, त्यांचे पती शांतीलाल बारेला (वय-४०), मुलगा संजय शांतीलाल बारेला (वय-१५), मुलगा संदीप शांतीलाल बारेला (वय-२०) आणि भावाचा मुलगा दयाराम धरमसिंग बारेला (वय-२०) हे सर्वजण झाडाखाली दबले गेले. या दुर्घटनेत रियानीबाई झाडाखाली दबून जागीच मरण पावल्या, तर त्यांचे पती, दोन्ही मुले आणि भावाचा मुलगा असे चौघे जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले आणि जखमींना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. रियानीबाईंच्या नातेवाईकांनी रुग्णालयात केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. या घटनेची नोंद जामनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली असून, बारेला कुटुंबावर अचानक कोसळलेल्या या संकटामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.