जळगाव, प्रतिनिधी : अभियांत्रिकीच्या नव्या प्रवासाची सुरुवात करणाऱ्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमासोबतच आवश्यक कौशल्ये, शिष्यवृत्तीच्या संधी, वेळेचे नियोजन आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर याची माहिती मिळावी, या उद्देशाने गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित सहा दिवसीय इंडक्शन कार्यक्रमाचा उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला.

समारोपाच्या दिवशी कंप्युटर प्रोफिशियन्सी या विषयावर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका प्रा. रेश्मा अट्टारडे यांनी मार्गदर्शन केले. शैक्षणिक तसेच औद्योगिक क्षेत्रात संगणकीय कौशल्यांचे वाढते महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी संगणकाचे ज्ञान आत्मसात करण्यासोबतच शिक्षण आणि कौशल्यविकासासाठी एआय टूल्सचा प्रभावी वापर कसा करावा, याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.

यानंतर ‘टाइम मॅनेजमेंट’ या विषयावर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET), जळगावशी संबंधित शिक्षक, प्रशिक्षक व शिक्षणतज्ज्ञ शैलेश शिरसाठ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वेळेचे योग्य नियोजन करण्यासाठी Pomodoro Technique, To-Do List, कामांचे पूर्वनियोजन, महत्त्वाच्या कामांना प्राधान्य आणि वेळेचा योग्य वापर यांसारख्या व्यावहारिक तंत्रांची माहिती त्यांनी दिली.

शिष्यवृत्ती योजना व विद्यार्थी सहाय्य या विषयावरील सत्रात महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डॉ. ईश्वर जाधव व शिष्यवृत्ती समन्वयक मीनल वानखेडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विविध शिष्यवृत्ती योजना, पात्रता, मिळणारे लाभ, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया तसेच शिष्यवृत्ती अर्ज भरताना होणाऱ्या सामान्य चुका याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.
समारोप सोहळ्यात मागील दिवशी आयोजित क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटी सेशनमधील विजेत्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये रील मेकिंग, रांगोळी, ड्रॉइंग, ब्लाइंड कोडिंग आणि मॅथ क्लब अशा विविध स्पर्धांचा समावेश होता. विजेत्यांचा गौरव करण्यासोबतच सर्व सहभागी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांनीही कार्यक्रमातील विविध सत्रांचे अनुभव व अभिप्राय व्यक्त केले.
यावेळी प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या अभियांत्रिकी शिक्षणाच्या प्रवासात सातत्याने सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. नेतृत्वगुण विकसित करून जबाबदार, सक्षम व कुशल व्यावसायिक बनण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचा समारोप विद्यार्थी तोषित इंगळे यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. सहा दिवसीय कार्यक्रमाचे समन्वयन प्रा. प्रविण सोनवणे व प्रा. पूनम वाणी यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. खुशाली बेलदार यांनी केले.
बेसिक सायन्सेस अँड ह्युमॅनिटीज विभागप्रमुख डॉ. नितीन भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथम वर्षाच्या अध्यापकवर्गाच्या सक्रिय सहकार्याने आणि प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा इंडक्शन कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला. कार्यक्रमामुळे नवोदित विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सकारात्मकता आणि अभियांत्रिकी शिक्षणाबद्दलचा उत्साह निर्माण झाला.








