जळगाव, प्रतिनिधी : शहरातील उघडे व धोकादायक विद्युत डीपी तसेच लटकणाऱ्या धोकादायक तारांमुळे नागरिकांच्या जीवितास कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी उपमहापौर मनोज चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची आढावा बैठक पार पडली.

या बैठकीत उपमहापौरांनी विद्युत विभागाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत शहरातील धोकादायक विद्युत यंत्रणेवर तातडीने उपाययोजना करण्याचे कडक निर्देश वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना दिले. “नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. कामात हलगर्जीपणा होऊन काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी ही वीज वितरण विभागाची असेल,” असा थेट इशाराच उपमहापौर मनोज चौधरी यांनी या बैठकीत दिला.

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात भाविक आणि नागरिकांची मोठी गर्दी होणार आहे. त्यामुळे गणेश विसर्जन व मिरवणूक मार्ग, प्रमुख गणेश मंडळे आणि गर्दीच्या ठिकाणी असलेल्या विद्युत तारा, डीपी व इतर उपकरणांची विशेष तपासणी करून आवश्यक ती दुरुस्ती त्वरित पूर्ण करावी, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या. तसेच, महापालिका व वीज वितरण विभागाने आपापसात उत्तम समन्वय राखून शहरातील सर्व धोकादायक स्पॉट्सचे तातडीने सर्वेक्षण करावे व त्यांची यादी तयार करून प्रतिबंधात्मक आणि संरक्षणात्मक कार्यवाही पूर्ण करावी, यावर भर देण्यात आला.

या महत्त्वपूर्ण बैठकीस महापालिका विद्युत विभाग प्रमुख, वीज वितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता एस. डी. उन्हाडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता आर. एल. नेमाडे, सहाय्यक अभियंता हर्षल नेहेते, सहाय्यक अभियंता कुरसंगे, सहाय्यक अभियंता यास्मीन तडवी आणि सहाय्यक अभियंता ललिता पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन सर्व प्रलंबित व धोकादायक कामांवर युद्धपातळीवर अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासन यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी दिले.








