रावेर, (प्रतिनिधी) : रावेर पोलीस ठाणे हद्दीतील एका खळबळजनक खून प्रकरणातील दोन फरार आरोपींना रावेर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा जळगावच्या पथकाने अवघ्या २४ तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयाने आरोपींना १७ जुलै २०२६ पर्यंत ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत शेख कुर्बान शेख शब्बीर (वय ३० वर्ष, रा. ऐनपूर, ता. रावेर) याच्या खुनाची फिर्याद त्याचा लहान भाऊ शेख सलमान शेख शब्बीर याने १२ जुलै २०२६ रोजी रावेर पोलीस ठाण्यात दिली होती. आरोपी गणेश विजय उर्फ संजय घोरपडे (वय २५, रा. भोर रेल्वे स्टेशनजवळ, रावेर) याचे मयताच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. काही दिवसांपूर्वी मयताची आई आजारी असल्याने ते घराबाहेर असताना आरोपीने मयताच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला होता.


यामुळे संतापलेल्या मयताने आणि त्याच्या आईने आरोपीला जाब विचारला असता, आरोपीने त्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली होती.
याच वादाचा राग मनात धरून मुख्य आरोपी गणेश घोरपडे आणि त्याचा साथीदार मेघराज वसंत सांगळे (वय ३१, रा. भोर रेल्वे स्टेशनजवळ, रावेर) या दोघांनी संगनमत करून मयताला दारू पाजली. त्यानंतर ९ जुलै ते ११ जुलैच्या दरम्यान नांदुरखेडा शिवारातील एका शेतात गळा दाबून त्याचा खून केला व मृतदेह टाकून पळ काढला.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील व गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदारांच्या मदतीने माग काढून २४ तासांच्या आत दोन्ही आरोपींना जेरबंद केले. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.








