जळगाव, (प्रतिनिधी) : गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक अभियांत्रिकी विभागातील द्वितीय वर्षाचा विद्यार्थी यतीश भारंबे याने सायबर सुरक्षा क्षेत्रातील उल्लेखनीय संशोधनाच्या जोरावर जगातील अग्रगण्य अंतराळ संशोधन संस्था नासाकडून अधिकृत गौरव मिळवून महाविद्यालयासह जळगाव जिल्ह्याचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल केले आहे.
नासाच्या असुरक्षीतता प्रकटीकरण अंतर्गत त्यांच्या उत्कृष्ट योगदानाची दखल घेत अधिकृत प्रशंसापत्र प्रदान करण्यात आले आहे. यतीश यांनी नासाच्या माहिती सुरक्षा प्रणालीतील संभाव्य सुरक्षात्रुटी शोधून ती जबाबदारीने संस्थेकडे नोंदविली. त्यांच्या या संशोधनामुळे नासाच्या माहिती प्रणालीची सुरक्षितता अधिक बळकट करण्यास मदत झाल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे. नासाचे एसआयएसओ वरिष्ठ एजन्सी माहिती सुरक्षा अधिकारी माईक विट यांनी पाठविलेल्या प्रशंसापत्रात यतीश यांच्या स्वतंत्र सुरक्षा संशोधक म्हणून केलेल्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी यतीश यांचे अभिनंदन करताना सांगितले की, हे यश गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. संशोधन, नवोपक्रम, सायबर सुरक्षा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या आधुनिक क्षेत्रांत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे आमचे प्रयत्न भविष्यातही सुरू राहतील.
या उल्लेखनीय यशाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील आणि डॉ. अनिकेत पाटील व विभागप्रमुख प्रा. निलेश वाणी यांनी यतीश यांचे अभिनंदन केले. सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या.








