जळगाव, (प्रतिनिधी) : येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्न असलेल्या एस. एस. मणियार विधी महाविद्यालयातील विद्यार्थिनी रेणुका सचिन जोशी यांनी एलएल.बी.च्या तीन वर्षांच्या अभ्यासक्रमात सलग तीनही वर्षे कॉलेजच्या टॉपर्स मध्ये राहण्याचा मान पटकावला आहे. त्यांनी ३ हजार गुणांपैकी १ हजार ६६९ गुण मिळवत बी प्लस (B+) श्रेणीत परीक्षा उत्तीर्ण होत उल्लेखनीय यश संपादन केले.
रेणुका जोशी यांनी प्रथम वर्षात भारतीय दंड संहिता (IPC) विषयात उत्कृष्ट कामगिरी करत ॲड. अच्युतराव अत्रे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रदान करण्यात येणारे सुवर्णपदक प्राप्त केले. हे सुवर्णपदक त्यांना महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले होते.
त्यांच्या या यशामागे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. युवाकुमार रेड्डी, प्राध्यापिका डॉ. विजेता सिंह, प्राध्यापिका डॉ. रेखा पाहुजा, प्राध्यापिका अंजली बोंदल आणि प्राध्यापिका स्वाती लोखंडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सातत्यपूर्ण अभ्यास, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी कायद्याच्या शिक्षणात ही उल्लेखनीय कामगिरी करून महाविद्यालयाचे नाव उंचावले आहे.
रेणुका जोशी या रामनिवास पारीक यांच्या कन्या असून, त्या ओंकारेश्वर देवस्थान ट्रस्टचे संचालक तथा अश्विनी मेडिकोचे संचालक राधेश्याम जोशी यांच्या स्नुषा आणि सचिन जोशी यांच्या पत्नी आहेत. त्यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक, सामाजिक आणि कौटुंबिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.







