जळगाव, (प्रतिनिधी) : गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात जागतिक दूरसंचार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन विभागाच्या टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विद्यार्थी संघटनेतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यंदा हा दिवस ‘डिजिटल लाईफ लाईन: स्ट्रेंगथनिंग रेसिलियन्स इन ए कनेक्टेड वर्ल्ड’ या संकल्पनेवर आधारित होता.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, अधिष्ठाता डॉ. तुषार कोळी आणि विभागप्रमुख डॉ. हेमंत इंगळे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी दूरसंचार क्षेत्राचा इतिहास, ५जी तंत्रज्ञान, उपग्रह संप्रेषण, इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) आणि डिजिटल भविष्य या विषयांवर अभ्यासपूर्ण भाषणे केली. यामध्ये मार्गेश वाघ, ऋतुजा ठेंग, यश धनगर, पावबा पाटील, प्राजक्ता पाटील, तुळजा महाजन आणि प्रणव थोरात या विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाच्या भविष्यावर विचारमंथन केले.
विभागप्रमुख डॉ. हेमंत इंगळे यांनी आपल्या मार्गदर्शनात दूरसंचार हे आधुनिक डिजिटल युगाचे बळकट आधारस्तंभ असल्याचे सांगत शिक्षण, आरोग्य, शेती आणि उद्योग क्षेत्रातील त्याचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच विद्यार्थ्यांनी संशोधन व स्टार्टअप्सच्या माध्यमातून पुढे येण्याचे आवाहन केले. प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना आधुनिक दूरसंचार क्षेत्रातील विविध संधींबाबत मार्गदर्शन केले. तंत्रज्ञानाच्या बळावर विद्यार्थी देशाच्या प्रगतीत मोलाचे योगदान देऊ शकतात, असे सांगत त्यांनी संस्थेसाठी उपग्रह (Satellite) निर्मितीसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांवर कार्य करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन प्रा. आर. व्हि. पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कीर्ती बोरोले या विद्यार्थिनीने केले. या यशस्वी आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील आणि डॉ. अनिकेत पाटील यांनी महाविद्यालयाचे व विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले आहे.







