जळगाव, (प्रतिनिधी) : पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या अभूतपूर्व यशाचे पडसाद सुवर्णनगरीत उमटले. जळगाव शहरातील जीएम फाउंडेशन कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची मोठी आतषबाजी करत आणि एकमेकांना पेढे भरवत हा विजय साजरा केला. यावेळी जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विजयाचा गोडवा आणि ‘झालमुडी’चा तडका..
साधारणपणे विजयाचा आनंद पेढे वाटून साजरा केला जातो, मात्र यावेळी जळगावात एक वेगळेच चित्र पाहायला मिळाले. पश्चिम बंगालमधील विजयाचे औचित्य साधून आमदार राजू मामा भोळे यांनी कार्यकर्त्यांसह बंगालची प्रसिद्ध ‘झालमुडी’ खाऊन विजयाचा आनंद द्विगुणित केला. “बंगालच्या मातीतील हा विजय साजरा करताना तेथील खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेणे हा एक वेगळा अनुभव होता,” अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.
ऐतिहासिक विजय, अविस्मरणीय दिवस.. -आ. राजूमामा भोळे
याप्रसंगी बोलताना आमदार राजू मामा भोळे म्हणाले की, “आजचा दिवस भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी अविस्मरणीय आहे. पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये जनतेने विकासाच्या राजकारणाला पसंती दिली आहे. कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत असून, हा विजय ऐतिहासिक आहे.”
#BJP #Bengal #Assam







