जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील वाढते ध्वनी प्रदूषण आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात जळगाव शहर वाहतूक शाखेने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत जप्त करण्यात आलेले १०० कर्कश आवाज करणारे सायलेन्सर आणि २५० बेकायदेशीर फॅन्सी नंबर प्लेट्स आज पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार रोड रोलरच्या साहाय्याने नष्ट करण्यात आल्या. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे नियमबाह्य वाहन चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून शहरात दुचाकींना मोठा आवाज करणारे सायलेन्सर लावून फिरण्याचे प्रमाण वाढले होते. या कर्कश आवाजामुळे स्थानिक रहिवासी, ज्येष्ठ नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या तक्रारींची दखल घेत वाहतूक शाखेने विशेष मोहीम राबवून असे १०० सायलेन्सर जप्त केले होते. यासोबतच, नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या २५० फॅन्सी नंबर प्लेट्सही ताब्यात घेतल्या होत्या. या सर्व साहित्याची आज जाहीर विल्हेवाट लावण्यात आली.
जळगाव जिल्ह्यात रस्ता अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सन २०२५ च्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यात एकूण ९३९ अपघात झाले, त्यापैकी ४५० अपघात हे प्राणघातक ठरले असून त्यात ४८७ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही परिस्थिती पाहता, राष्ट्रीय महामार्ग आणि इतर रस्त्यांवरील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी वरिष्ठांच्या सूचनेनुसार कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
विना हेल्मेट प्रवास, ट्रीपल सीट, अल्पवयीन वाहन चालक, रॅश ड्रायव्हिंग, दारू पिऊन वाहन चालवणे, चुकीच्या बाजूने वाहन चालवणे (रॉन्ग साईड) आणि वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यापुढेही नियमितपणे आणि अधिक तीव्र स्वरूपात सुरू राहणार आहे.
जळगाव जिल्हा ‘शून्य प्राणहानी’ स्तरावर नेण्यासाठी रस्ता सुरक्षा समितीची स्थापना करण्यात आली आहे. रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करून नागरिकांनी स्वतःचा जीव वाचवावा आणि पोलिसांच्या दंडात्मक कारवाईपासून सावध राहावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.







