जळगाव, (प्रतिनिधी) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप), जळगाव शाखेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक बांधिलकी जपत अभाविपच्या कार्यकर्त्यांनी जयंतीनिमित्त निघालेल्या शोभायात्रेतील सुमारे २५०० हून अधिक नागरिकांना शीतपेय वाटप करून दिलासा दिला.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने आणि अभिवादनाने करण्यात आली. यावेळी डॉ. आंबेडकरांनी दिलेला सामाजिक समता, न्याय, बंधुता आणि ‘शिकाल तर टिकाल’ हा शिक्षणाचा संदेश कार्यकर्त्यांनी स्मरणात ठेवला. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
सामाजिक बांधिलकीचे दर्शन..
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अभाविपच्या वतीने सेवाकार्याचा वारसा जपण्यात आला. उन्हाचा वाढता तडाखा लक्षात घेता, शोभायात्रेत सहभागी झालेल्या अबालवृद्धांसाठी थंड पेयांची व्यवस्था करण्यात आली होती. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तीने २५०० पेक्षा जास्त नागरिकांना शीतपेय वाटप केले. या उपक्रमातून सामाजिक एकोपा आणि बांधिलकीचा एक उत्तम आदर्श शहरासमोर ठेवण्यात आला.
उत्साहपूर्ण वातावरण..
हा संपूर्ण सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि चैतन्यमय वातावरणात पार पडला. यावेळी अभाविपचे पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार केवळ पुस्तकात मर्यादित न ठेवता ते प्रत्यक्ष आचरणात आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” अशी भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.








