जळगाव, (प्रतिनिधी) : “भारतीय संगीताच्या आकाशातील अजरामर स्वरकन्या आशा भोसले यांच्या निधनाची बातमी मनाला चटका लावून गेली आहे. त्यांच्या सुरांनी केवळ कान तृप्त केले नाहीत, तर अनेक पिढ्यांचे आयुष्य समृद्ध केले. त्यांच्या गाण्यांमध्ये निसर्गाची कोमलता, मातीचा सुगंध आणि जीवनातील ओलावा कायम जाणवत राहिला,” अशा शब्दांत जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
निसर्ग आणि स्वरांचे अतुट नाते..
आशाताईंच्या कार्याचा गौरव करताना अशोक जैन म्हणाले की, कविवर्य ना. धों. महानोर यांच्या काव्यातील मातीशी असलेली नाळ जशी जिवंत आहे, तशीच ती आशाताईंच्या स्वरांतूनही रसिकांना अनुभवायला मिळाली. त्यांच्या काही गाण्यांतून शेती, निसर्ग आणि मातीतल्या भावविश्वाचा सुगंध दरवळत राहिला. जणू ती आपल्या भूमीची काळजाशी जपलेली ओळखच होती. श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या कार्यातून जसे जल, जमीन आणि शेतकऱ्यांशी नाते जपले गेले, तसेच आशाताईंच्या सुरांतूनही जीवनाशी असलेले नाते अधिक दृढ झाले होते.
जैन हिल्सवरील त्या भेटीच्या स्मृतींना उजाळा..
आशाताईंच्या जळगावशी असलेल्या स्नेहबंधांना उजाळा देताना त्यांनी एका ऐतिहासिक प्रसंगाची आठवण सांगितली. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा पहिला पदवी प्रदान सोहळा ७ सप्टेंबर १९९३ रोजी झाला होता. त्यावेळी आशाताई भोसले आणि ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना ‘डी.लिट.’ पदवी देऊन सन्मानित करण्यात आले होते.
”त्यावेळी जैन हिल्स येथे त्यांच्या भेटीचा तो प्रसंग आजही मनात ताजा आहे. त्यांचा साधेपणा, प्रेम आणि आत्मीयतेने झालेला तो संवाद आजही स्मरणात कोरलेला आहे,” असे अशोक जैन यांनी नमूद केले.
स्वरसम्राज्ञी आशाताई भोसले यांच्यासमवेत श्रद्धेय भवरलालजी जैन, कविवर्य ना. धों. महानोर व मान्यवर (संग्रहित छायाचित्र दि. 07/09/1993)









