जळगाव, (प्रतिनिधी) : शहरात वाढत्या घरफोडीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने धडाकेबाज कामगिरी केली आहे. गेंदालाल मिल परिसरातून तीन अट्टल चोरट्यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून दोन गुन्ह्यांतील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दिनांक २३ ते २५ मार्च दरम्यान गेंदालाल मिल भागातील शेख रईस शेख यांच्या घरातून १०,४०० रुपयांची चोरी झाली होती. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. तपासादरम्यान गुन्हे शोध पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, संशयित आरोपी १) आदील शेख मजीद, २) गुफरान शेख करीम, आणि ३) कासिम सैय्यद अली (सर्व रा. गेंदालाल मिल) यांनी ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सापळा रचून डॉआंबेडकर रिक्षा स्टॉप परिसरातून तिघांना ताब्यात घेतले.
पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून पोलिसांनी खालील मुद्देमाल जप्त केला आहे:
रोकड: १०,००० रुपये (५०० च्या २० नोटा)
चांदी: ४ चांदीच्या अंगठ्या (४०० रु.) आणि ९७ ग्रॅमचे पैंजण (५,५०० रु.)
सोने: १.९७० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी (१४,००० रु.)
या कारवाईमुळे शहरातील दोन घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल झाली असून, आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सागर शिंपी, स.पो.नि. सुरेश आव्हाड, सुनील पाटील, उमेश भांडारकर, सतीश पाटील, विरेंद्र शिंदे, योगेश पाटील, भगवान पाटील, नंदलाल पाटील, दीपक शिरसाठ, अमोल ठाकूर, राहुलकुमार पांचाळ आणि प्रणय पवार यांच्या पथकाने केली.







