जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील रामानंद नगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका खून प्रकरणातील फरार आरोपीला स्थानिक पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. जळगावच्या जिल्हापेठ पोलिसांनी ही मोठी कारवाई केली असून, आरोपींकडून दोन गावठी कट्टे आणि आठ तलवारी अशी घातक शस्त्रे हस्तगत केली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह त्याच्या साथीदारालाही बेड्या ठोकल्या आहेत.
रामानंद नगर पोलीस ठाण्यातील खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी धीरज कोळी हा जळगाव शहरात फिरत असल्याची गुप्त माहिती जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अनिल वाघ यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या एका विशेष पथकाने आर.आर. शाळेच्या बाजूला असलेल्या गल्लीत सापळा रचला.
पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांनी दुचाकीवरून जाणाऱ्या धीरज कोळी आणि त्याच्या एका साथीदाराला अडवले. त्यांची चौकशी केली असता, त्यांनी आपली नावे धनंजय उर्फ धीरज दत्तू कोळी (वय २०, रा. पाळधी, ता. धरणगाव) आणि अजय मारुती डोळे (वय २३, रा. नेरी दिगर, ता. जामनेर) अशी सांगितली. संशयावरून त्यांच्या दुचाकीची झडती घेतली असता, दुचाकीच्या बाजूला बांधलेल्या पिशवीत एक तलवार आणि इंजिन जवळ लपवलेला एक सिल्व्हर रंगाचा गावठी कट्टा मिळून आला.

न्यायालयाने दोन्ही आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली या दरम्यान धीरज दत्तू कोळी आणि अजय डोळे याची सखोल चौकशी केली असता त्यांच्याकडील आणखी एक गावठी व ७ तलवारी जप्त करण्यात आल्या. या कारवाईत पोलिसांनी १ लाख १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे, ज्यात ६० हजार रुपयांचे दोन कट्टे, ४० हजार रुपयांच्या आठ तलवार आणि १५ हजार रुपयांची दुचाकी यांचा समावेश आहे.
अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी धीरज कोळी याच्यावर यापूर्वी धरणगाव आणि रामानंद नगर पोलीस ठाण्यात मारामारी, आर्म्स ॲक्ट आणि खूनाचे प्रयत्न यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याने हा गावठी कट्टा विक्रीसाठी आणला असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
ही धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ, उपनिरीक्षक गोपाळ देशमुख आणि त्यांच्या पथकाने केली आहे.







