जळगाव, (प्रतिनिधी) : लेखक व पत्रकार प्रकाश तेली यांच्या ‘शाश्वत विचार’ या २० व्या ग्रंथाचे प्रकाशन नुकतेच संपन्न झाले. धुळे जिल्ह्यातील बारीपाडा येथील प्रसिद्ध समाजसेवक आणि पर्यावरणवादी पद्मश्री चैत्राम पवार यांच्या हस्ते जळगाव येथे एका घरगुती व साध्या कार्यक्रमात या ग्रंथाचे विमोचन करण्यात आले. यावेळी अनिल पाटील, लेखक प्रकाश तेली, योगिता तेली, ॲड. किरण तेली, आर्यन तेली व आर्या तेली उपस्थित होते.
ग्रंथ प्रकाशनानंतर बोलताना पद्मश्री चैत्राम पवार यांनी प्रकाश तेली यांच्या साहित्यिक प्रवासाचे तोंडभरून कौतुक केले. ते म्हणाले की, “प्रकाश तेली यांचे साहित्य कार्य अत्यंत आगळेवेगळे असून ते मानवी जीवनाला योग्य दिशा देणारे आहे. समाजाला आज अशाच सकारात्मक साहित्याची खरी गरज आहे.” यावेळी त्यांनी तेली कुटुंबाला आपल्या मूळ गावी (बारीपाडा) येण्याचे स्नेहपूर्वक निमंत्रणही दिले.
’शाश्वत विचार’ हा ग्रंथ केवळ शब्दांचा संग्रह नसून ते एक वास्तववादी लिखाण आहे. जीवनाचे सार सांगण्यासोबतच मनात नवचैतन्य निर्माण करण्याचे सामर्थ्य या विचारांमध्ये आहे. नकारात्मकतेवर मात करून यशाची शिखरे गाठू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी हा ग्रंथ संग्रही असावा असा आहे. सजीव सृष्टीतील काही अपरिवर्तनीय सत्ये आणि मानवी मनोकामना कशा पूर्ण होतात, यावर यात प्रकाश टाकण्यात आला आहे.
प्रकाश तेली यांनी आतापर्यंत विविध सामाजिक विषयांवर १९ ग्रंथ प्रकाशित केले आहेत. यात रस्ते सुरक्षा, बालविवाह, वाढती लोकसंख्या, शेतकरी, मतदान जागृती, जलसंधारण आणि निसर्ग संवर्धन अशा ज्वलंत विषयांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, लवकरच त्यांचा २१ वा ग्रंथ ‘वास्तव विचार’ वाचकांच्या भेटीला येणार आहे. या २० व्या ग्रंथनिर्मितीसाठी त्यांना इंद्रवदन वरणकर, किरण तेली आणि आर्यन तेली यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.







