जळगाव, (प्रतिनिधी) : होळीच्या सणानिमित्त केवळ लाकडे न जाळता, शरीराला घातक ठरणारे ‘जंक फूड’ चा आपल्या आहारातून वर्ज करण्याचा संदेश देत आरोग्याचा जागर करण्याचा एक अनोखा आणि आदर्श उपक्रम संत ज्ञानेश्वर विद्यालयात राबविण्यात आला. ‘जंक फूड मुक्त होळी’ या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी आरोग्याला हानी पोहोचवणाऱ्या खाद्यान्न सवयींना तिलांजली देत निरोगी जीवनशैलीचा संकल्प केला.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या हस्ते विधीवत होळी पूजनाने झाली. पारंपारिक पद्धतीने पूजा झाल्यानंतर इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते होळीचे दहन करण्यात आले. या होळीमध्ये विद्यार्थ्यांनी प्रतीकात्मकरीत्या जंक फूडचे दहन करून, यापुढे तेलकट आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांपासून दूर राहण्याचा निश्चय केला. या प्रसंगी रूपाली आव्हाड यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
”आजच्या धावपळीच्या युगात विद्यार्थ्यांनी आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. ‘आरोग्यदायी होळी, आनंदी होळी’ हा संदेश केवळ शाळेपुरता मर्यादित न राहता तो घराघरात पोहोचणे आवश्यक आहे.”
— मुख्याध्यापक मुकेश नाईक
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबाबत मोठी जागरूकता निर्माण झाली. केवळ सण साजरा न करता, तो सामाजिक आणि आरोग्यदायी दृष्टिकोनातून कसा साजरा करता येतो, याचे उत्तम उदाहरण या विद्यालयाने समाजासमोर ठेवले आहे.







