जळगाव, (प्रतिनिधी) : महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षाने शिस्तीचा कडक बडगा उगारला आहे. पक्षशिस्त आणि धोरणांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी पुन्हा तीन प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. काही दिवसांपूर्वीच २७ जणांवर कारवाई करण्यात आली होती, त्यानंतर आता ही दुसरी मोठी कारवाई करण्यात आली आहे.
यांच्यावर झाली कारवाई..
पक्षाने ज्यांची प्राथमिक सदस्यत्व आणि पदे रद्द केली आहेत, त्यात खालील नावांचा समावेश आहे:
अक्षय चत्रभुज सोनवणे: (जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष)
किशोर (श्रीकृष्ण) गोविंदा वाघ: (प्रभाग १९ ‘ड’ मधून अपक्ष उमेदवारी केल्याने कारवाई)
देवयानी सुभाष चौधरी: (प्रभाग १३ ‘ब’ मधून राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गटाकडून निवडणूक लढवत असल्याने कारवाई)
निवडणूक काळात पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध काम करणे, अपक्ष उमेदवारी अर्ज भरणे किंवा प्रतिस्पर्धी पक्षाकडून निवडणूक लढवणे यावर भाजपने कडक पवित्रा घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जिल्हा कोअर कमिटीच्या बैठकीत या पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर सविस्तर चर्चा झाली. या कार्यकर्त्यांच्या कृत्यामुळे पक्षाच्या प्रतिमेला आणि संघटनात्मक शिस्तीला बाधा निर्माण होत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, त्यांचे प्राथमिक सदस्यत्व तात्काळ प्रभावाने रद्द करण्याचे आदेश जिल्हाध्यक्षांनी दिले आहेत.
जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले की, “हा निर्णय पक्षहित आणि संघटनात्मक शिस्त अबाधित राखण्यासाठी घेण्यात आला आहे. निवडणुकीच्या काळात पक्षविरोधी कारवाया कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नाहीत.” या कारवाईमुळे जळगाव भाजपमध्ये खळबळ उडाली असून, या हकालपट्टीचे पडसाद प्रत्यक्ष मतदानावर काय उमटतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







