जळगाव, (प्रतिनिधी) : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत केलेल्या कामाचे बिल पास करण्यासाठी ७,०००/- रुपयांची मागणी करून तडजोडीअंती ४,०००/- रुपयांची लाच स्वीकारताना ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग, अमळनेर येथील वर्ग-१ अधिकारी दिलीप दत्तात्रय पाटील यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी), जळगावच्या पथकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदयान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार हे खाजगी ठेकेदार असून त्यांनी स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत मौजे व मजरे हिंगोणे, ता. चोपडा येथे सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाचे ३,५५,०००/- रुपयांचे काम पूर्ण केले होते. या कामाचा अहवाल बनवून देण्याच्या मोबदल्यात उपविभागीय अधिकारी दिलीप पाटील यांनी १३ ऑक्टोबर रोजी तक्रारदाराकडे एकूण बिलाच्या २ टक्के, म्हणजे ७,०००/- रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी १५ ऑक्टोबर रोजी ला.प्र.वि. जळगाव यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली.
तक्रारीच्या अनुषंगाने पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. यावेळी आरोपी दिलीप पाटील यांनी बिलाच्या २ टक्के, (७००० रूपये) लाचेची मागणी करून तडजोडीअंती ४,०००/- रुपये लाच स्वीकारण्यास सहमती दर्शविली.
त्यानुसार, १५ ऑक्टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा कारवाई केली. या कारवाईदरम्यान आरोपी लोकसेवक दिलीप पाटील यांनी तक्रारदाराकडून ४,०००/- रुपये लाच रक्कम त्यांच्या अहवालाचे काम करून देण्याच्या मोबदल्यात स्वतःसाठी ‘बक्षीस’ म्हणून स्वीकारली. लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले.
आरोपी दिलीप दत्तात्रय पाटील हे ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग, अमळनेर (विभाग महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरण, वर्ग-०१) येथे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याविरुद्ध अमळनेर पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या सापळा कारवाई त पर्यवेक्षण अधिकारी पोलिस उप अधिक्षक योगेश ठाकूर, सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक रेश्मा अवतारे, सफौ. विलास पाटील, पोहेकों. नरेंद्र पाटील, पोना. हेमंतकुमार महाले (ला.प्र.वि. नंदुरबार) आणि पोकों. राकेश दुसाने (ला.प्र.वि. जळगांव) यांनी सहभाग घेतला.