दसऱ्याच्याच रात्री घटना घडल्याने परिसरात हळहळ
जळगाव: (प्रतिनिधी) : शहरातील कासमवाडी परिसरात जुन्या वादातून एका २७ वर्षीय तरुणाची दोघांनी धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी, ३ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.
ज्ञानेश्वर उर्फ नाना भिका जाधव (वय-२७, रा. कासमवाडी) असे मयत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कासमवाडी परिसरात राहणाऱ्या ज्ञानेश्वर उर्फ नाना याचा त्याच्या घरासमोर राहणाऱ्या काही तरुणांशी जुना वाद होता.
शुक्रवारी मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास ज्ञानेश्वर उर्फ नाना हा कासमवाडी येथील एकता मित्र मंडळ येथे उभा असताना, जुन्या वादातून त्याच्या घरासमोर राहणाऱ्या दोन जणांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. हल्लेखोरांनी नाना जाधव याच्या पोटावर आणि मांडीवर गंभीर वार केले, ज्यामुळे तो जागीच गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेतील नाना उर्फ ज्ञानेश्वरला त्याच्या मित्रांनी तातडीने दुचाकी वाहनावरून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ICU) त्याच्यावर उपचार सुरू असताना, तासाभरातच त्याचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणपुरे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पीएसआय चंद्रकांत धनके यांच्यासह पोलिसांच्या पथकाने तातडीने रुग्णालयात धाव घेतली. यावेळी नातेवाईकांनी रुग्णालयात प्रचंड आक्रोश केल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने तपास सुरू करत एका तरुणाला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले आहे. दरम्यान जिल्ह्यात खुनाच्या घटनांचे सत्र थांबत नसल्यामुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.