जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव शहर यंदा एका मोठ्या क्रीडा सोहळ्यासाठी सज्ज झाले आहे. २ ते ८ ऑगस्ट २०२५ दरम्यान जळगाव येथील जैन हिल्स परिसरातील अनुभूती बंदिस्त मंडपात ३८व्या राष्ट्रीय ११ वर्षांखालील बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत देशभरातून ५०० हून अधिक युवा बुद्धिबळपटू सहभागी होणार असून, एकूण ८ लाखांची रोख बक्षिसे आणि आकर्षक चषक जिंकण्याची संधी त्यांना मिळणार आहे.
यासंदर्भात महिती देण्यासाठी सोमवारी २९ जुलै रोजी जैन हिल्स येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी जळगाव जिल्हा बुद्धिबळ असोसिएशन आणि जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष अतुल जैन, फारूक शेख, नंदलाल गादिया, अरविंद देशपांडे आदी उपस्थित होते.
जळगाव जिल्हा बुद्धिबळ असोसिएशन आणि जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने, महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने आणि अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या मार्गदर्शनाखाली हा “बाल चमूंचा बुद्धिबळ महासंग्राम” होणार आहे. जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेड या आंतरराष्ट्रीय कंपनीने या स्पर्धेला प्रायोजित करून मोठे पाठबळ दिले आहे.
स्पर्धेची ठळक वैशिष्ट्ये:
▪️स्थळ आणि कालावधी: जळगाव येथील निसर्गरम्य जैन हिल्स परिसरातील अनुभूती बंदिस्त मंडप, २ ते ८ ऑगस्ट २०२५.
▪️नियम आणि फेऱ्या: आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या नियमावलीनुसार एकूण ११ फेऱ्यांमध्ये ही स्पर्धा खेळवली जाईल. प्रत्येक डावासाठी ९० मिनिटे आणि प्रत्येक चालीसाठी ३० सेकंदाची वाढीव वेळ निर्धारित आहे.
▪️पंच मंडळ: कोलकाता येथील आंतरराष्ट्रीय पंच श्री देवाशीष बनवा हे मुख्य पंच असतील, तर जळगावचे आंतरराष्ट्रीय पंच प्रवीण ठाकरे सहाय्यक पंच म्हणून काम पाहतील. त्यांच्यासोबत गुजरातचे प्रशांत रावल आणि अन्य १४ पंच स्पर्धेचे संचलन करतील.
▪️बक्षिसे: स्पर्धेसाठी एकूण ८ लाखांची रोख पारितोषिके आणि चषक दिले जातील. विशेष म्हणजे, जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेड तर्फे प्रत्येक डावातील निकालानुसार विजयी, उपविजयी आणि बरोबरीत असलेल्या खेळाडूंना विशेष मूल्यांकनानुसार रोख रकमेचे पारितोषिक दिले जाणार आहे, ज्यामुळे प्रत्येक खेळाडूला प्रोत्साहन मिळेल.
▪️राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संधी: ही ११ वर्षांखालील वयोगटातील मानांकन स्पर्धा असली तरी, यातील विजेते खेळाडू आशियाई आणि जागतिक स्पर्धेसाठी पात्र ठरतील. नवोदित खेळाडूंना आंतरराष्ट्रीय मानांकन (फिडे मानांकन) मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे.
▪️सहभागी खेळाडू: अंदमान निकोबार, आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, चंदिगड, छत्तीसगड, दिल्ली, गोवा, गुजरात, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, पंजाब, राजस्थान अशा विविध राज्यांतील खेळाडू यात सहभागी होत आहेत. ५५० नोंदणीकृत खेळाडूंपैकी जवळपास ४०० खेळाडूंना फिडे मानांकन प्राप्त आहे.
▪️आकर्षण: पुणे येथील प्रथम मानांकित अद्विक अग्रवाल (२२५१) आणि मुलींमध्ये केरळची देवी बीजेस (१८६९) यांसारखे आंतरराष्ट्रीय खेळाडू स्पर्धेचे मुख्य आकर्षण आहेत. पहिले प्रत्येकी सर्वोच्च सहा सामने डिजिटल बोर्डवर लाईव्ह खेळले जातील आणि चेसबेस अॅपद्वारे सामने लाईव्ह पाहता येणार आहेत.
जळगाव जिल्हा बुद्धिबळ असोसिएशन आणि जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष अतुल जैन यांनी सांगितले की, ही स्पर्धा भारतातील एकमेव बुद्धिबळ स्पर्धा आहे जी प्रत्येक स्पर्धकांच्या उत्कृष्ट खेळासाठी प्रोत्साहनार्थ पुरस्कृत करणारी असेल.
अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे सल्लागार आणि जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेडचे चेअरमन अशोक जैन यांचे बहुमोल मार्गदर्शन या स्पर्धेला लाभले आहे. तसेच, महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेचे आणि जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे पदाधिकारी तसेच जैन इरिगेशन सिस्टिम्स कंपनीचे सर्व सहकारी स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी कार्यरत आहेत.
या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेमुळे जळगावच्या क्रीडा क्षेत्रात नवा अध्याय लिहिला जाईल आणि युवा बुद्धिबळपटूंना आपले कौशल्य दाखवण्याची एक उत्कृष्ट संधी मिळेल.