जळगाव, (प्रतिनिधी) : धावत्या रेल्वेची धडक लागून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी ७ एप्रिल रोजी शिरसोली ते जळगाव दरम्यान घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हरिविठ्ठल नगरातील ऋषीकेश आनंदा मिस्तरी (२५, रा. हरिविठ्ठल नगर) हा तरुण मजुरी काम करायचा. रविवारी शिरसोली दरम्यान डाऊन रेल्वे मार्गावर खंबा क्रमांक ४१६/४१४ जवळून जात असताना त्याला रेल्वेची धडक लागली व त्यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना तेथून जात असलेल्या नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी रामानंद नगर पोलिसांना माहिती दिली. या परिसरातील नागरिकांनी मयताची ओळख पटवली. त्याचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस नाईक हेमंत कळसकर करीत आहेत.