विजय बाविस्कर | पाचोरा, (प्रतिनिधी) : मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेले शेत पाणंद रस्ते, पाणी पुरवठा योजना या केवळ संबंधित अधिकाऱ्यांच्या व कंत्राटदारांच्या अनास्थेमुळे प्रलंबीत राहत असून हे विषय प्राधान्याने पूर्ण करा. मार्च २०२५ अखेर पर्यंत विविध कामांना गती न दिल्यास अधिकाऱ्यांची आपण गय करणार नाही असा सज्जड दम आमदार किशोर पाटील यांनी आढावा बैठकीत दिला. याबैठकीत सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद पंचायत समिती पाणीपुरवठा कृषी, वीज मंडळ, पोलिस प्रशासन आदी विभागातील अधिकारी उपस्थित होते.
प्रसंगी आगामी शिवजयंतीच्या आधी मतदार संघात उभारलेल्या शिवस्मारकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे बसविण्याची परवानगी मागणे कामी सर्व ग्रामपंचायतींनी आगामी २६ जानेवारी रोजी होणाऱ्या ग्रामसभेत ठराव करण्याच्या सूचना सर्व सरपंच व ग्रामसेवकांना द्याव्यात, अशी सूचना आ.किशोर पाटील यांनी केली असून पाचोरा प्रांताधिकारी कार्यालयात शुक्रवारी घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी प्रांताधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार बनसोडे, उपविभागीय आरोग्य अधिकारी डॉ.सतिष टाक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता दीपक पाटील, मुख्याधिकारी मंगेश देवरे, लघु पाटबंधारे विभागाचे चव्हाण, तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव, पोलिस निरीक्षक अशोक पवार, पिंपळगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे, एमएसईबीचे कार्यकारी अभियंता प्रमोद हेलोडे, गटविकास अधिकारी समाधान पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षद मुलाणी, भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक एम.व्ही. तोतावार, सहाय्यक निबंधक पाटील, आगार प्रमुख पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी लांडे, महिला बाल विकास विभागाच्या जिजा राठोड यांचेसह पाचोरा तालुक्यातील शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते. सोबत जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, माजी जि. प. सदस्य मधुकर काटे, बाजार समिती सभापती गणेश पाटील, माजी नगराध्यक्ष संजय गोहील, सुमित पाटील, समाधान पाटील,स्विय सहाय्यक राजेश पाटील, प्रवीण ब्राह्मणे, माजी पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर सोनार आदींची उपस्थिती होती.
यावेळी ग्रामीण भागातील रस्त्यांची दर्जोन्नती, पर्यटन विकासाअंतर्गत बहुळा धरण, काकणबर्डी, पिंपळगाव हरेश्र्वर येथील हरिहरेश्वर यांचे मंदिर, पिंपळगाव (हरे) येथे नवीन बस स्थानक निर्मिती, गोठा शेड, ग्रामीण भागातील पुल, विजेचे सब स्टेशन, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण भागातील बस फेऱ्या, कृषी विभागाची जमीन, शहरातील मानसिंगका येथील खुला भूखंड व घरे, शासकीय कर्मचाऱ्यांची निवासस्थाने, शहरातील अतिक्रमित घरे आदी विषयांबाबत आ.किशोर पाटील यांनी अधिकाऱ्यांकडून आढावा जाणून घेत आवश्यक त्या सूचना केल्या.
आपली बांधिलकी जनतेशी असून शासन दरबारी अधिकारी वर्गास काही तांत्रिक अडचणी असल्यास त्यांनी निसंकोचपणे सांगाव्यात मात्र कायदेशीर बाजूंचा बाऊ करत जनतेला वेठीस धरू नये अशी सूचना देखील त्यांनी अधिकाऱ्यांना केली.
आजच्या आढावा बैठकीला वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता श्री थानवी हे गैरहजर असल्याने त्यांच्याशी संबंधित विषयांची नेमकी उत्तरे त्यांचे ऐवजी आलेल्या अधिकाऱ्यांना देता न आल्याने आ.पाटील यांनी नाराजी व्यक्त केली यापुढे बैठकीला येताना परिपूर्ण माहितीसह उपस्थित रहावे अशी सूचना देखील केली.