जळगाव, दि.१६ – तरुणांना देशसेवेत जाण्यासाठी प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. तरुणांची देशसेवेला निवड होणे म्हणजे पालकांचा हा सत्कार असतो. नूतन मराठा महाविद्यालयातील अनेक एनसीसी कॅडेट सैन्यात गेलेले आहे. विद्यार्थ्यांच्या यशात गुरुजनांचीदेखील महत्वाची भूमिका आहे, असे प्रतिपादन कमांडिंग ऑफिसर अभिजित महाजन यांनी केले.
येथील नूतन मराठा महाविद्यालयातील दहा विद्यार्थ्यांची भारतीय सैन्यदलात अग्निवीर म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा व पालकांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अभिजित महाजन बोलत होते. मंचावर प्राचार्य डॉ. एल.पी. देशमुख, एनसीसी प्रमुख लेफ्टनंट शिवराज पाटील, उपप्राचार्य संजय पाटील, प्रा.हेमाक्षी वानखेडे, लेफ्टनंट भालेराव उपस्थित होते. सैन्यदलात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच रामेश्वर नामदेव पाटील व प्रेरणा गजानन पाटील दोघेही टीएससी, गोल्ड दिल्ली यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी कमांडिंग अधिकारी अभिजित महाजन यांनी उपस्थित कॅडेटच्या विद्यार्थ्यांना सांगितले की, जे विद्यार्थी सैन्यात दाखल झाले आहेत, त्यात आई वडिलांचं तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकांच योगदान या विद्यार्थ्यांना दिशा दाखवण्यासाठी महत्वाचं आहे. देशसेवेसाठी तरुणांनी सैन्यात भरती होण्याचे आवाहन त्यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.दिलराज पाटील यांनी, अतिथी यांचा परिचय प्रा.भागवत पाटील यांनी तर आभार लेफ्टनंट शिवराज पाटील यांनी मानले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.