जळगाव, दि. 03 – मराठीच नव्हे तर भारतीय नाट्यसृष्टीतील महत्वाचे नाटककार, लेखक म्हणून ओळखले जाणारे जयंत पवार यांच्या दुःखद निधनाने सर्वांना धक्का बसला. त्यांच्या ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ या कथासंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. जयंत पवारांचे साहित्य, नाटकं, कथा हे शब्दरूपात आपली सोबत करणारच आहेत, त्यांच्या सोबतच्या आठवणी आपल्या सर्वांच्या मनात आहेत. परिवर्तनशी जयंत पवारांचे नातं अतिशय जिव्हाळ्याचे होते, परिवर्तनच्या सांस्कृतिक उपक्रमांना त्यांचा सतत पाठिंबा असायचा.
जयंत पवारांचं जाणं ही साहित्य व नाट्यसृष्टीसाठी दुःखद घटना असून त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 4 सप्टेंबर, शनिवारी सायं. ६ वा “श्रध्दांजली : एका थोर नाटककाराला” चे आयोजन परिवर्तनच्या वतीने करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम ऑनलाईन होणार असून यात ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त पद्मश्री डॉ. भालचंद्र नेमाडे, हिंदी भाषेतील जेष्ठ कादंबरीकार व कथालेखक उदय प्रकाश, जेष्ठ कादंबरीकार रंगनाथ पठारे, जेष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे, जेष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष, कवी श्रीकांत देशमुख, अभिनेते संजय नार्वेकर, रंगकर्मी शंभू पाटील यात सहभागी होणार आहेत. या सभेत साहित्य, नाट्य क्षेत्रातील कलावंतांनी सहभागी व्हावे असे आवाहन परिवर्तनच्यावतीने नारायण बाविस्कर व मंजुषा भिडे यांनी केले आहे.